देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी
भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत काँग्रेसने गड राखण्यात यश मिळवले
देगलूर-बिलोलीत काँग्रेसचा मोठा विजय
नांदेड, २ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज शांतता व सुव्यवस्थेत पार पडली. मतमोजणीच्या 30 फेऱ्यानंतर निवडणुकीचा अंतिम निकाल निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गिरी यांनी जाहीर केला. इंडियन नॅशनल काँग्रेसचे जितेश रावसाहेब अंतापूरकर हे 41 हजार 933 मताच्या फरकाने विजयी झाले.
देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मोठा विजय प्राप्त करून काँग्रेस पक्षाने आपली जागा राखली. या निवडणुकीत पंढरपूरची पुनरावृत्ती होणार असा जप भाजपने चालवला होता; पण काँग्रेस नेते व ज्येष्ठ मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपला धक्का देत भाजपचे स्थानिक नेते प्रताप पाटील चिखलीकर आणि त्यांच्या चमूला सणसणीत चपराक लगावली. पराभूत उमेदवार सुभाष साबणे यांची आता कोंडी झाली आहे.
काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर देगलूरमध्ये पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीत एकूण 12 उमेदवार रिंगणात होते, पण मुख्य लढत काँग्रेस, भाजप आणि वंचित बहुजन आघाडीत होती. काँग्रेसतर्फे जितेश अंतापूरकर, भाजपतर्फे सुभाष साबणे आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे डॉ. उत्तम रामराव इंगोले निवडणूक रिंगणात होते.
उमेदवारनिहाय मतमोजणीत मिळालेले मते पुढीलप्रमाणे आहेत. जितेश रावसाहेब अंतापूरकर (इंडियन नॅशनल काँग्रेस 1 लाख 8 हजार 840), सुभाष पिराजीराव साबणे (भारतीय जनता पार्टी 66 हजार 907), उत्तम रामराव इंगोले (वंचित बहुजन आघाडी 11 हजार 348), विवेक पुंडलिकराव केरुरकर (जनता दल (सेक्युलर) 467), प्रा. परमेश्वर शिवदास वाघमारे (बहुजन भारत पार्टी 155), डी. डी. वाघमारे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे) 215), अरुण कोंडीबाराव दापकेकर (अपक्ष 143), गजभारे साहेबराव भीवा (अपक्ष 183), भगवान गोविंदराव कंधारे (अपक्ष 274), मारोती लक्ष्मण सोनकांबळे (अपक्ष 243), श्रीमती विमल बाबूराव वाघमारे (अपक्ष 496), कॉ. प्रा. सदाशिव राजाराम भुयारे (अपक्ष 486), नोटा (वरीलपैकी कोणीही) नाही (1 हजार 103), रद्द झालेले मतदान 30 आहे, असे एकुण 1 लाख 90 हजार 890 एवढे मतदान झाले आहे. या देगलूर पोटनिवडणुकीसाठी एकुण 150 अधिकारी कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले होते.
भास्करराव पाटील खतगावकर यांचा वेगळा पवित्रा भाजपला धक्का देईल असे मानले जात होते. निवडणूक निकालानंतर ते स्पष्ट झाले आहे. खतगावकर यांनी भाजपला दिलेली सोडचिठ्ठी अशोक चव्हाण आणि काँग्रेससाठी लाभदायी ठरली, असे विजयी उमेदवार जितेश अंतापूरकर यांना मिळालेल्या मताधिक्यावरून मानले जात आहे.
निवडणुकीच्या तोंडावर दुसऱ्या पक्षातील नेत्याला भाजपत घेऊन त्याची उमेदवारी लादण्याचा प्रयोग पहिल्यांदा बापूसाहेब गोरठेकर यांच्या बाबतीत २०१९ मध्ये झाला होता; पण भोकरच्या मतदारांनी त्यांचा सपाटून पराभव केला. हेच गोरठेकर देगलूर पोटनिवडणुकीच्या काही दिवस आधी आपल्या मूळ पक्षात गेले. त्यावरून कोणताही बोध न घेता, भाजप नेत्यांनी शिवसेनेच्या साबणेंना पक्षप्रवेशापूर्वीच उमेदवारीची बक्षिसी दिली खरी; पण मतदारांना, विशेषत: शिवसैनिकांना हा प्रयोग रुचला नाही. त्यांनी साबणेंचाही गोरठेकर करून टाकला.
अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया
देगलूर पोटनिवडणुकीतील जितेश अंतापूरकर यांचा दणदणीत विजय ही स्व.आ. रावसाहेब अंतापूरकर यांना खरी श्रद्धांजली आहे. ४१ हजारांहून अधिक मताधिक्याचा हा विजय काँग्रेस व महाविकास आघाडीवरील महाराष्ट्राच्या विश्वासाचे प्रतिक असून, मतदारांनी भाजपच्या द्वेषमूलक राजकारणाला चपराक लगावली आहे.एमआयएम किंवा वंचितला मत देणं भाजपसाठी फायदेशीर ठरतं, याची मतदारांना जाणीव झाली आहे. या निवडणुकीत वंचितचा उमेदवार असणं भाजपच्याच रणनीतीचा भाग होता. पण लोकांनी ही रणनीती ओळखली.देगलूरच्या विजयाने महाविकास आघाडी व राज्य सरकार भक्कम नक्कीच झाले आहे. राज्यातील सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरु असताना जनतेने दिलेला हा कौल महत्त्वाचा आहे. देशात झालेल्या निवडणुकांच्या निकालावरुन जनता भाजपच्या विरोधात आहे हे चित्र स्पष्ट आहे!देगलूर पोटनिवडणुकीत मी विकासाचा अजेंडा मांडला, तर भाजपने वैयक्तिक टिकेवर भर दिला. परिणाम सर्वांसमोर आहे.काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांनी उमेदवारी देण्यासंदर्भात घेतलेला निर्णय असो, राहुल गांधींची त्यामधील भूमिका असो, त्यासोबतच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व शरद पवार साहेब असोत, या सर्वांच्या आशीर्वादाने देगलूरला जितेश अंतापूरकर विजयी झाले आहेत.