सदोष खते, बियाणे बनविणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई व्हावी

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे मागणी

नवी दिल्ली :  सदोष खते, बियाणे, कीटकनाशके बनविणाऱ्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे  केली.

येथील कृषी भवन येथे श्री.पटोले यांनी श्री.तोमर यांची भेट घेऊन शेतकऱ्यांसमोर असलेल्या या गंभीर समस्येवर सविस्तरपणे चर्चा केली.

शेतकरी वर्षभर मेहनत करून शेतात पीक घेत असतात त्यात त्यांना खत कंपन्या, बियाणे कंपन्या, कीटकनाशक औषधी निर्माण करणाऱ्या कंपन्या सदोष मालाची निर्मिती करून शेतकऱ्यांची लुबाडणूक करीत असतात त्यामुळे शेतकरी अधिक आर्थिक अडचणीत येतात. अशा बनावटी खत, बियाणे, कीटकनाशक निर्माण करणाऱ्या कंपन्यांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) यासारख्या कायद्याचा वापर करून कडक कारवाई करावी, अशी मागणी बैठकीत श्री.पटोले यांनी  केली.

राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांवर कारवाईचे अधिकार केंद्र शासनाच्या अखत्यारीत असल्याने केंद्र शासनाने यावर योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांची होणारी लुबाडणूक शक्य तितक्या लवकर रोखावी, अशी विनंती श्री.पटोले यांनी केली. केंद्रीय मंत्री श्री.तोमर यांनी याबाबत योग्य त्या कारवाईचे आश्वासन दिले असल्याचे श्री.पटोले यांनी बैठकीनंतर सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *