५० लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टन्सिंग पाळत लग्न समारंभ साजरा करण्याची परवानगी-आपत्ती व्यवस्थापनमंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती
मुंबई, दि.23 : कोरोना विषाणूचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊनदरम्यान गर्दी टाळण्याच्या दृष्टीने केवळ 50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टन्सिंग पाळत लग्न समारंभ साजरा करण्याची परवानगी देण्यात आली असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
श्री. वडेट्टीवार म्हणाले, 50 लोकांच्या मर्यादेतच सोशल डिस्टन्सिंग पाळून खुले लॉन, विना वातानुकुलित मंगल कार्यालय, हॉल/सभागृह येथे लग्न समारंभ पार पाडण्यास परवानगी देण्याबाबतच्या विविध मागण्या शासनाकडे करण्यात आल्या होत्या. या मागण्यांचा विचार करून शासनाने या बाबतीत निर्णय घेतला आहे.
नागरिकांची मागणी विचारात घेता तसेच आता पावसाळा सुरू झाला असल्यामुळे, खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात 50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टन्सिंग तसेच कोविड-19 संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर लग्न समारंभ पार पाडण्यास परवानगी देण्यात येत असल्याचेही मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी सांगितले.