भाजपा राणे यांच्या पाठीशी, अटकेच्या निषेधार्थ प्रखर निदर्शने करणार-प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

मुंबई,२४ऑगस्ट /प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पाठीशी असून त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपाचे कार्यकर्ते राज्यभर प्रखर निदर्शने करतील, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी केली.

          ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी सांगितले की, कोणतेही अटक वॉरंट नसताना केंद्रीय मंत्र्याला अटक करण्याचा प्रकार देशात पहिल्यांदाच घडला आहे. जनादेशाच्या विरोधात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीने सत्तेचा दुरूपयोग करून सूडबुद्धीने राणे यांना अटक केली आहे. भाजपा याचा निषेध करते.

          ते म्हणाले की, नारायण राणे हे पक्षासाठी महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्या कर्तृत्वामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला आहे. मा. राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेला मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे घाबरून आघाडी सरकारने कारवाई केली आहे. त्यासाठी बळाचा वापर करा, असे पालकमंत्री सांगत असल्याचेही वाहिन्यांवरून स्पष्ट झाले आहे.

          त्यांनी सांगितले की, नारायण राणे यांच्या सुटकेसाठी भाजपा सर्व ते प्रयत्न करेल. या बाबतीत न्यायालय योग्य तो आदेश देईल, असा विश्वास आहे. खासदार म्हणून त्यांना असलेल्या विशेषाधिकारांचा भंग झाल्यामुळे संसदेत संबंधितांकडेही भाजपाच्या खासदारांकडून तक्रार करण्यात येईल.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्याचा प्रयत्न ही सूडबुद्धी आहे. नियम ध्यानात घेता राणे केंद्रीय मंत्री असल्याने त्यांना अटक करता येणार नाही. तरीही कोकणात जन आशिर्वाद यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद रोखण्यासाठी राजकीय हेतूने त्यांना अटक करण्यात आली. नारायण राणे यांनी काही बोलल्यानंतर त्याला विरोधक उत्तर देऊ शकतात. परंतु, एखाद्या वाक्याच्या आधारे केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याला थेट अटक करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे या राज्य सरकारच्या कायद्याच्या ज्ञानाबद्दलच शंका निर्माण करणारे आहे. महाविकास आघाडी सरकारने सातत्याने न्यायालयाकडून थपडा खाल्या आहेत, तशा या प्रकरणातही बसतील, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

राणेसाहेबांची एक बोलण्याची शैली आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे. एखाद्या नेत्याने काही विधान केले तर त्याला उत्तर देण्याचा प्रघात आहे. लगेच गुन्हा दाखल करणे योग्य नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पंतप्रधानांना जाहीर सभेत चोर म्हणाले होते किंवा त्यांनी पक्षाच्या दसरा मेळाव्यात राज्यपालांवर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली होती. हे असे विषय काढले तर किती खटले दाखल करावे लागतील, याचा विचार करावा. राज्यात शिवसेनेच्या महाविकास आघाडी सरकारचे राज्य आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करणे ही त्यांची जबाबदारी आहे. अशाप्रकारे शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपाच्या कार्यालयावर दगडफेक करणार असतील तर त्याची प्रतिक्रिया काय उमटेल याचा विचार करा, असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची पदानुसार पक्षविरहीत भूमिका आवश्यक आहे. पण त्या सातत्याने पक्षीय भूमिकेतून बोलत आहेत. त्यांची विधाने आणि लेखांच्या आधारे लवकरच त्यांच्याविरोधात न्यायालयात दाद मागण्यात येईल, असेही ते म्हणाले.