राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात समाजसेवा महाविद्यालय सुरू करण्याचा प्रयत्न

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा कोविड संसर्गात उत्कृष्ट सेवा कार्याबद्दल सत्कार

बीड,१३ ऑगस्ट /प्रतिनिधी :- राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात समाजसेवा महाविद्यालय ( एम एस डब्ल्यू) सुरू करण्याचा प्रयत्न असून येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीसाठी आपण सुसज्ज होणे गरजेचे आहे यासाठी उपाय योजना करण्यात येत आहेत असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

कोरोना काळात पाच ते साडेपाच लाख कोरोना योद्ध्यांनी नागरिक आणि समाजासाठी  काम केले  त्यांना सहाय्य करत  रुग्णांसाठी देखील उत्कृष्ट काम करणा-या राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांना  प्रोत्साहन देण्यासाठी राज्याचे  पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाअंतर्गत बीड जिल्ह्यातील युवकाचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात सत्कार करण्यात आला. कोविड काळात एनएसएस विद्यार्थ्यांनी कोरोना योद्ध्यांना आरोग्य विभाग, पोलीस आणि शासनास सहकार्य केले असून त्यांचा सत्कार त्यांच्या जिल्हात जाऊन करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे असल्याचे मत्री महोदयांनी सांगितले.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, कुंडलीक खाडे, अंकित प्रभु , टी.आर. पाटील आदि उपस्थित होते.

मंत्री महोदयांच्या हस्ते व्हेंटीलेटर , बायोपॅप मशीन जिल्हा प्रशासनास सुर्पुद करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी या मशीन स्वीकारल्या. यावेळी एन एस एस विद्यार्थी  प्रविण आटोळे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री सामंत म्हणाले प्रत्येक जिल्हयात समाज सेवा महाविद्यालय (MSW college )सुरु करण्यासाठी  राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय  मुंडे यांच्याशी आपली चर्चा झाली आहे असे  या प्रसंगी मंत्री श्री सामंत म्हणाले .

जिल्हयात येणा-या आपत्तीसाठी यंत्रणा सुसज्ज करता येईल यादृष्टीने उपाययोजना आखल्या जात आहेत या आपत्तींना तोंड देण्यासाठी  युवाशक्तीला देखील तयार करण्याची गरज आहे असेही त्यांनी सांगितले.या उपक्रमासाठी मंत्री महोदय मराठवाड्याचा दौरा करत असून नांदेड, परभणी, हिंगोली येथे भेटी दिल्या आहेत.