राज्यात अतिवृष्टी व महापूराची अभूतपूर्व परिस्थिती
मुंबई,२३ जुलै /प्रतिनिधी :-राज्यात सर्वदूर होत असलेली अतिवृष्टी आणि निर्माण झालेली पूरस्थिती अभूतपूर्व असून, प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा, एनडीआरएफ, लष्कर, नौदल, स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सहकार्यानं युद्धपातळीवर बचाव व मदतकार्य करीत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांची पाणीपातळी झपाट्याने ओसरू लागली.शृंगारपूर-कातूरडीकोंड रस्त्यावरील मोरी खचल्याने वाहतूक बंद आहे
रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर आंबा घाटा मधील मुर्शी येथेदरड हटविण्याचे काम सुरू आहे. वाहतूक बंद आहे.मौजे अणदेरी, ता. संगमेश्वर येथील रास्ता खचला आहे. वाहतूक बंद करण्यात आली आहे.
सद्या चिपळूणमध्ये 15 बोटी उपलब्ध असून त्यापैकी 8 बोटी मार्फत बचाव कार्य सुरु आहे. सद्या चिपळूण येथे network नसल्याने फोन लागत नाहीत. Police Wireless मार्फतच संदेशवहन सुरु ठेवणेबाबत सूचीत केलेले आहे.
चिपळूण येथील वाशिष्ठी नदीवरील मुंबई-गोवा महामार्गावरील जुन्या पुलाचा भाग वाहून गेला. हा ब्रिटिशकालीन पुल आहे. आज पहाटे हा प्रकार घडला. पुलाच्या मधोमध असलेला काही भाग वाहून गेला. या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प.
चिपळूण मधील पुरात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी च्या प्रयत्नांना वेग @ndmaindia ची दोन पथके जिल्हा पोलीस दल तसेच काही स्वयंसेवी संघटना आणि कोस्ट गार्ड नागरिकांची सुटका करीत आहेत.
तिलारी, वाघोटन व कर्ली नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा
सिंधुदुर्गनगरी – भारतीय हवामान खात्यामार्फंत अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने तिलारी, वाघोटन व कर्ली नदी पातळीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. या नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात येत असून सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता विजयकुमार थोरात यांनी केले आहे.
तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असल्याने आज सकाळी 11.00 वाजता तिलारी नदीची तिलारीवाडी येथील पाणी पातळी धोका पातळी 43.30 मीटर पर्यंत पोहोचली आहे. तिलारी धरणातून सद्य:स्थितीत 1140 घ.मी./सेकंद एवढस विसर्ग सुरु आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात, धरणाच्या खालील बाजूस तिलारी नदी व पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने धरण साठ्या होणारी वाढ व विसर्ग पाहता आज धोका पातळी(43.60 मीटरच्या पुढे) ओलांडणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील प्रामुख्याने तिलारीवाडी, कोनाळकट्टा, परमे, देवमळा, धनगरवाडी, वानोसीवाडी, मणेरी, तळेवाडी, दोडामार्ग, घोटगेवाडी, घोटगे, आवाडे, साटेली, भेडशी, खानयाळे, वायंगणतड, बोडदे, भटवाडी, कुडासे, भरपालवाडी, झरेबांबर, आणि सासोली (वाघमळा) गावातील ग्रामस्थ/ शेतकरी यांना सतर्क राहणेविषयी आवाहन करण्यात येत आहे.
सद्य:स्थितीत पाणी पातळी अ.क्र. नदीचे नांव धोका पातळी मी. इशारा पातळी मी आजची पातळी मी. (ज्या ठिकाणी पातळी मोजली त्या ठिकाणाचे नांव 1 तिलारी 43.600 41.600 43.30 तिलारीवाडी 2 कर्ली 10.910 9.910 10.50 कुडाळ/ पावशी (भंकसाळ नदी पुल) 3 वाघोटन 10.500 8.500 8.50 खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची इशारा पातळी खारेपाटण पुलाजवळ 8.50 मी. असून सद्याची नदीची पातळी ही 8.50 मी. आहे. तसेच कर्ली खोऱ्यामध्ये नदीची पातळी भंगसाळ पुलाजवळ घेतली जाते सद्य:स्थितीत भंगसाळ पुलाजवळ नदीची पातळी 10.50 मी. असून धोका पातळी 10.91 मी. आहे. सदरचा येणारा विसर्ग अनियंत्रित व विस्तृत पाणलोट क्षेत्रातून येत आहे. त्यामुळे नदीपात्रात नजीकच्या ग्रामस्थांना सतर्क राहण्याविषयी आवाहन करण्यात येत आहे.
सिंधुदुर्गनगरी:रांजणवाडी येथे घरावर दरड कोसळून महिलेचा मृत्यू : दोन जखमी
जिल्ह्यातील 290 कुटुंबातील 1271 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी
सिंधुदुर्गनगरी – जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे कणकवली तालुक्यातील रांजणवाडी येथे घरावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत संगिता प्रकाश जाधव (वय 40) या महिलेचा मृत्यू झाला असून प्रकाश शांताराम जाधव (वय 47) बळीराम कृष्णा जाधव (वय 80) या दोघांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यातील एकूण 290 कुटुंबातील 1271 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. अजूनही हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. तालुकानिहाय अनुक्रमे स्थलांतरीत कुटुंबाची संख्या आणि व्यक्तींची संख्या पुढीलप्रमाणे – दोडामार्ग एकूण 107 कुटुंबांतील 425 व्यक्ती, सावंतवाडी 84 कुटुंबातील 451, वेंगुर्ला 2 कुटुंबातील 11 व्यक्ती, कुडाळ 72 कुटुंबातील 273 व्यक्ती, मालवण 7 कुटुबांतील 26 व्यक्ती, कणकवली 3 कुटुंबातील 22 व्यक्ती, देवगड 15 कुटुंबातील 63 व्यक्ती, अशा एकूण 290 कुटुंबातील 1271 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. एनडीआरएफची दोन पथके होणार दाखल जिल्ह्यामध्ये सावंतवाडी आणि दोडामार्ग या दोन ठिकाणी एनडीआरएफचे प्रत्येकी एक पथक आज साधनसामग्रीसह दाखल होणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. अद्यापही हवामान खात्याने पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी विशेषत: नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी सतर्क राहून सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून प्रशासनाला सहकार्य करावे.अधिक माहितीसाठी 1077 या टोल फ्री क्रमांकावर तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष 02362-228847 क्रमांकावर संपर्क करावा. असे आवाहनही त्यांनी केले आहे.
ग्रामविकास मंत्र्यांनी घेतलापूर परिस्थितीचा आढावा
कोल्हापूर : जिल्ह्यात सतत सुरु असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीचा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेमध्ये आज आढावा घेतला. येथील यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल पाटील, मनपा आयुक्त डॉ . कादंबरी बलकवडे ,मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, माजी जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, अधिक्षक अभियंता महेश सुर्वे उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री म्हणाले, जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ होत आहे. असाच पाऊस सुरु राहिला तर आणि धरणांतून विसर्ग सोडल्यास सन 2019 पेक्षा जिल्ह्यात पुराची गंभीर परिस्थिती निर्माण होईल. पूर परिस्थितीत प्रशासन चांगले काम करत आहे. प्रशासनाने केलेल्या आवाहानाला नागरिकांनी प्रतिसाद देवून वेळीच स्थलांतरित होवून सहकार्य करावे. पुरामुळे स्थलांतरित केलेल्या नागरिकांना प्रशासनाने आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. त्याचबरोबरपुरामुळे राष्ट्रीय महामार्गावर अडकलेल्या लोकांची सोय करण्यास प्राधान्य द्यावे. कोणाची गैसोय होऊ नये याची काळजी घेण्यात यावी, अशा सूचना देऊन ग्रामविकास मंत्र्यांनी शिरोळ तालुक्यातील पूर परिस्थिती, कृष्णा नदीची पाणी पातळी, कोयना व अलमट्टी धरणातील विसर्गाची माहिती घेतली.
आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने शिरोळ तालुक्यात सर्व टिम कार्यरत ठेवा अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी कोल्हापूर शहरातील पूर परिस्थितीची माहिती मनपा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मंत्री महोदयांना दिली. चौकट (पूर पाहण्यास गर्दी करु नये संततधार पावसामुळे नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. पाण्याचा वेग मोठा असल्याने पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी करु नये – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ) यावेळी ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांनी या बैठकीतूनच व्हिडीओ कॉलद्वारे कागलमधील पूर परिस्थिती आणि उपाय योजनांची माहिती घेतली.
116 बंधारे पाण्याखालीराधानगरी धरणातून 1425 क्युसेक विसर्ग
कोल्हापूर, : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 212.80 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणच्या विद्युत विमोचकातून 1425 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे, तारळे व शिरगाव. तुळशी नदीवरील- बीड, आरे, बाचणी, घुंगुरवाडी, कांचनवाडी, चांदे व भाटणवाडी. कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन, बाजारभोगाव, पेंडाखळे, कांटे, करंजफेन व वालोली. कुंभी नदीवरील- शेनवडे, कळे, वेतवडे, आसळज, मांडूकली, सांगशी व कातळी. धामणी नदीवरील- पनोरे, गवसी, म्हासुर्ली, सुळे व आंबर्डे, वारणा नदीवरील- चिंचोली, माणगाव, कोडोली, शिगांव, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, चावरे, खोची व दानोळी. कडवी नदीवरील- वाळूर, भोसलेवाडी, येलूर, कोपार्डे, शिगांव, सवतेसावर्डे व सरुडपाटणे. दुधगंगा नदीवरील- सिद्धनेर्ली, सुळकुड बाचणी, दत्तवाड, सुळंबी, तुरंबे व कसबा वाळवे. वेदगंगा नदीवरील- निळपण, वाघापूर, गारगोटी, म्हसवे, कुरणी, बस्तवडे, सुरुपली, चिखली, करडवाडी, शेणगाव, शेळोली, कडगाव, सुक्याची वाडी, तांबाळे, अनप, दासेवाडी, पाटगाव व वाण्याचीवाडी. हिरण्यकेशी नदीवरील- साळगाव, ऐणापूर, निलजी, गिजवणे, खाणदळ, चांदेवाडी, देवर्डे, दाभीळ, हजगोळी, जरळी, हरळी भादवण, गजरगाव व करपेवाडी. घटप्रभा नदीवरील- कानडे सावर्डे, पिळणी, बिजूर भोगाली, हिंडगाव, तारेवाडी, अडकूर व कानडेवाडी, ताम्रपर्णी नदीवरील- कोवाड, चंदगड, कुर्तनवाडी, हल्लारवाडी, हजगोळनाला व ढोलगरवाडी , चित्री नदीवरील- कारपेवाडी, चिकोत्रा नदीवरील- कासारी, वडगांव, अर्जुनवाडा, मेतके, गलगले, नंद्याळ व बेळुंकी असे एकूण 116 बंधारे पाण्याखाली आहेत.जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 82.98 दलघमी, वारणा 930.63 दलघमी, दूधगंगा 515.26 दलघमी, कासारी 65.97 दलघमी, कडवी 71.24 दलघमी, कुंभी 65.27 दलघमी, पाटगाव 89.27 दलघमी, चिकोत्रा 37.37 दलघमी, चित्री 53.41 दलघमी (पूर्ण क्षमतेने भरला), जंगमहट्टी 25.07 दलघमी, घटप्रभा 44.17 दलघमी, जांबरे 23.23 दलघमी, आंबेआहोळ 30.98, कोदे (ल.पा) पूर्ण क्षमतेने भरला आहे. तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 53.10 फूट, सुर्वे 49.11 फूट, रुई 72.3 फूट, इचलकरंजी 65 फूट, तेरवाड 58.8 फूट, शिरोळ 56.6 फूट, नृसिंहवाडी 56.6 फूट अशी आहे.
सांगली शहरात पुराचे पाणी मोठ्या प्रमाणावर पसरू नये यासाठी धरणातून होणारा विसर्ग नियंत्रित – पालकमंत्री जयंत पाटील
पाणीपातळी स्थीर ठेवण्यासाठी प्रयत्नशील
सांगली: आज सकाळी 8 पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत साधारणपणे 100 मि.मी. पाऊस पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सांगली आर्यविन पूल येथे पाणीपातळी 52 फूटापर्यंत पोहोचेल असा सुरूवातीचा अंदाज होता. पण काहीसा पावसाचा जोर मंदावल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग मर्यादित करण्यात आला. सांगली शहरामध्ये पाणी अधिक प्रमाणात जावू नये यासाठी पाणी विसर्ग नियंत्रित करून आर्यविन पूल येथे 45 ते 46 फूटापर्यंत पाणीपातळी राहील या पद्धतीने नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.
राजापूर बंधाऱ्यावर कोयनेमधला विसर्ग हा जवळपास 45 हजार क्युसेक्सचा आहे. सातारा जिल्ह्यातील 4 धरणे व कोयना धरणामधील विसर्ग असा एकूण विसर्ग जवळपास 1 लाख क्युसेक्स आहे. सर्व मिळून राजापूर बंधाऱ्यातून पुढे जाणारा एकूण विसर्ग हा जवळपास 2 लाख क्युसेक्स पर्यंत आता असल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
पाण्याची पातळी वाढत आहे… तातडीने स्थलांतरीत व्हा- जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
- -स्थालांतरितांना शुध्द पाणी, चांगले भोजन द्या
- -पशुधनाचे संरक्षण करा,
- चारा उपलब्ध करुन द्या
- -निवारा केंद्राच्या ठिकाणी कोरोनाची चाचणी प्राधान्याने करा
- – प्रशासकीय यंत्रणांना निर्देश
सांगली: पाण्याची पातळी वाढत आहे. सावधानता बाळगा, तातडीने स्थलांतरीत व्हा, शासन आपल्या पाठीशी असल्याने घाबरुन जाऊ नका, जिल्हा प्रशासनाने निर्माण केलल्या निवारा केंद्रांमध्ये साहित्य, जनावरांसह सुरक्षितपणे पोहचा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. मौजे डिग्रज, भिलवडी माळवाडी परिसरातील साठेनगर, वसंतनगर, मौलाना नगर, दत्तनगर या पुरग्रस्त भागाची जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी मिरज प्रातांधिकारी समीर शिंगटे, कडेगाव प्रातांधिकारी गणेश मरकड, तहसिलदार निवास धाने, जिल्हा आरोग्य अधिकारी मिंलीद पोरे संबधित ग्रामपंचायतींचे सरपंच, पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, पावसाचा जोर वाढतच असून नद्याच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नागरीभागात पाणी शिरत असून अनेक कुटुंबे स्थलांतरीत करावी लागत आहेत. ही कुटुंबे स्थलांतरीत करीत असताना संबधितांनी प्रशासनास सहकार्य करावे. जास्तीत जास्त दिवसाच्या वेळी स्थलांतरीत व्हावे, रात्रीच्यावेळी अचानक पाणी वाढल्यास स्थलांतरण प्रक्रिया करणे जिकरी होते व श्वापदांचा त्रास होण्याची शक्यता असते. तसेच पुरग्रस्त भागांमध्ये बोटींद्वारे रेस्क्यु ऑपरेशन करण्याची वेळ येवू नये याबाबत दक्षता घेण्यात यावी.
पुरग्रस्तांसाठी उभारण्यात आलेल्या निवारा केंद्रांवर सुविधा चांगल्या प्रकारच्या पुरविण्यात याव्यात. त्यांना देण्यात येणारे भोजन, चांगल्या प्रतीचे असावे. त्याचबरोबर शुध्द पाणी पुरवठा करण्यात यावा. विस्तापित झालेल्या लोकांबरोबरच त्यांच्या पशुधानाचेही संरक्षण करण्यात यावे. त्यासाठी त्यांना चाराही उपलब्ध करुन देण्यात यावा. असे निर्देश प्रशासकीय यंत्रणांना देऊन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, भिलवडी – माळवाडी भागात दोन निवारा केंद्रे निर्माण करण्यात आली असून या ठिकाणी आतापर्यंत 398 लोकांना व 350 जनावरांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. जसजसे पाण्याची पातळी वाढेल त्या नुसार नागरीभागातील लोकांचे स्थलांतर करण्यात यावे. निवारा केंद्रांच्या ठिकाणी कोरोना चाचणी प्राधान्यांने करण्यात यावी. ज्या व्यक्ती पॉझिटीव्ह अढळतील त्यांना तातडीने विलगीकरण कक्षात ठेवण्यात यावे. त्याचबरोबर मास्क, सॅनिटायझर हे प्राधान्यांने पुरविण्याबरोबरच प्राथामिक औषधे उपलब्ध करण्यात यावेत. निवारा केंद्रांच्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाराऱ्याची नेमणूक करण्यात यावी. तसेच पूरग्रस्त क्षेत्रात जास्तीजास्त सुविधा पुरविण्यावर प्राधान्य द्यावे.
पूरग्रस्तांचे स्थलांतर युद्धपातळीवर करण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील प्रयत्नशील
कोल्हापूर : पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर होत चालली आहे. पुराचा वेढा असणाऱ्या प्रयाग चिखली, आंबेवाडी परिसरातील पूरग्रस्तांच्या मदतकार्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत पंचगंगा नदीवरील शिवाजी पूल येथून एनडीआरएफची तिसरी टीम रवाना झाली. यावेळी आमदार पी.एन.पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार शीतल मुळे-भामरे तसेच एनडीआरएफचे जवान उपस्थित होते. पूरग्रस्त प्रयाग चिखली, आंबेवाडी भागातील बहुतांशी नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असून उर्वरित सर्व नागरिकांचे सुरक्षित स्थळी युद्धपातळीवर स्थलांतर करण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील प्रयत्नशील आहेत.
शहर व ग्रामीण भागातील पूरग्रस्तांचे प्रशासनाच्या वतीने स्थलांतर करण्यात येत आहे. शहरात देखील काही भागात पुराचे पाणी वाढत आहे. अशा वेळी पालकमंत्री सतेज पाटील नागरिकांच्या स्थलांतर व मदतकार्यात सहभागी झाले आहेत. महावीर कॉलेज जवळील डायमंड हॉस्पिटल तसेच खानविलकर पेट्रोल पंप परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. पूरपरिस्थितीची पाहणी करुन पालकमंत्री सतेज पाटील यांनी पूरग्रस्तांना दिलासा दिला. डायमंड हॉस्पिटलमधील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना हॉस्पिटल मधून सुखरुप बाहेर काढण्यासाठी पालकमंत्री श्री. पाटील स्वतः पुढे सरसावले आहेत.
भर पावसात पुरग्रस्तांसाठी मदतकार्य करणारे एनडीआरएफचे जवान व स्वयंसेवकांच्या कामाचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी कौतुक केले. जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गंभीर परिस्थिती उद्भवल्यास पूरग्रस्तांचे तात्काळ स्थलांतर व मदतकार्यासाठी एनडीआरएफच्या आणखी 4 टीमची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली आहे. जिल्ह्यात एनडीआरएफच्या 2 टीम काल दुपारी तर आज आणखी एक टीम दाखल झाली असून आणखी 4 टीम आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. प्रत्येकी एका टीममध्ये 3 बोटी, 3 अधिकारी, 25 जवान आहेत.
पूराचा संभाव्य धोका ओळखून नदीकाठच्या १८९ कुटुंबातील ७५५ जणांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर
सातारा : गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील नदीकाठच्या लोकांचे पूराचा संभाव्य धोका ओळखून एकूण 189 कुटुंबातील 755 जणांना त्यांच्या गावातील जवळच्या नातेवाईकांकडे तसेच नगरपालिका शाळा या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आलेले आहे.
कराड तालुक्यातील तांबवे गावातील 50 कुटुंबातील 207 व्यक्तींना गावातील जवळच्या लोकांकडे व नातेवाईक यांच्याकडे, कराड येथील 42 कुटुंबातील 163 व्यक्तींना नगरपालिका शाळा क्र. 2,3,4,11 येथे, नांदगाव येथील 12 कुटुंबातील 49 व्यक्तींना गावातील जवळच्या लोकांकडे व नातेवाईक यांच्याकडे, काले येथील 15 कुटुंबातील 58 व्यक्तींना गावातील जवळच्या लोकांकडे व नातेवाईक यांच्याकडे, टाळगाव येथील 30 कुटुंबातील 118 व्यक्तींना गावातील जवळच्या लोकांकडे व नातेवाईक यांच्याकडे, पोतले येथील 12 कुटुंबातील 52 व्यक्तींना आनंदराव चव्हाण विद्यालय पोतले व जानुबाई मंदिर पोतले येथे, येणके येथील 3 कुटुंबातील 13 व्यक्तींना जवळच्या नातेवाईकांकडे, आणे येथील 8 कुटुंबातील 30 व्यक्तींना जवळच्या नातेवाईकांकडे स्थलांतरित करण्यात आले आहे.
वाई तालुक्यातील जांभळी येथील 3 कुटुंबातील 14 व्यक्तींना जवळच्या नातेवाईकांकडे स्थलांतरित करण्यात आले आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील दरे, धावली, भेकवली, येरणे येथील 9 कुटुंबातील 30 व्यक्तींना जवळच्या नातेवाईकांकडे, पाटण तालुक्यातील पाटण शहरातील 5 कुटुंबातील 21 व्यक्तींना स्थलांतरित करण्यात आले आहे.
मदतकार्य सुरु
मदत कार्यातून मिरगाव येथील 150 व्यक्ती, आंबेघर येथील 50 व्यक्ती, ढोकवळे येथील 50 व्यक्ती, सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहेत. वाझे येथील 50 व्यक्तींना बोटींनी हलविण्याचे काम सुरु असून एक टीम एनडीआरएफ ची मदतीसाठी मिरगाव येथे पोहचली आहे. 2 टीम भुवनेश्वर वरून मागविल्या असून त्या आता पुण्यातून कराडकडे रवाना झाल्या आहेत. नांदगाव ता. कराड 50, पाली 15 सुरक्षित ठिकाणी हलविले असल्याची माहिती जिल्ह्याधिकारी शेखर सिंह यांनी दिली.