अखेर सत्य पुढे आलेच…!कोरोनाच्या मृतांचे लपवलेले आकडे अखेर समोर आलेच- फडणवीस

मुंबई: महाराष्ट्रात प्रशासकीय यंत्रणांनी कोरोनाच्या मृत्यूचे दडवून ठेवलेले आकडे अखेर समोर आले आहेत. मात्र, आता या प्रक्रियेला फेरतपासणीचे गोंडस नाव देण्यात आले आहे. राज्यात नेमके किती मृत्यू झाले आहेत याची संख्या दडवण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केला होता. यासंबंधी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहिलं होतं. 24 तासांच्या आत ठाकरे सरकारने फेरपडताळणी करत COVID-19 च्या मृत्यूंची वस्तुस्थिती सांगणारे आकडे जाहीर केले आहेत.

यानंतर आज प्रशासकीय यंत्रणांकडून मुंबईतील ८६२ आणि राज्यातील ४६६ कोरोना मृतांचे आकडे नव्याने जाहीर करण्यात आले. त्यामुळे आता राज्यातील कोरोना मृतांच्या आकडेवारीत १३२८ जणांची भर पडली आहे. त्यामुळे अखेर सत्य समोर आलेच. आता सरकारने दोषींवर कठोर कारवाई करावी, असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

Image

15 जूनपर्यंत राज्यात कोरोनाबळींची संख्या 4128 होती. त्यात आजच्या या फेरपडताळणीनंतर जवळपास 30 टक्क्यांनी वाढली आहे.या विषयावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, “माझी राज्य सरकारला विनंती आहे की, या प्रक्रियेला आकड्यांच्या फेरपडताळणीचे गोंडस नाव न देता, गेले 3 महिने ही आकडेवारी लपविणार्‍यांवर काय कारवाई करणार, हे सांगितलं गेलं पाहिजे.”

काल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवून गेल्या तीन महिन्यांपासून काही कोरोनामृत्यू होऊनसुद्धा ते प्रत्यक्ष आकडेवारीत दाखविले जात नसल्याबद्दल तक्रार केली होती. ICMR आणि जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कारोना बळी कसे नोंदवायचे, याचे स्पष्ट निर्देश दिले असल्याने ही कार्यकक्षा डेथ ऑडिट कमिटीची कशी काय होऊ शकते? असा सवाल फडणवीस यांनी विचारला होता. ही समिती मृत्यूसंख्या कमी करण्यासाठी आहे की, मृत्यूसंख्या दडपण्यासाठी, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. अखेर आज राज्य सरकारने हे 1328 मृत्यू अधिकचे असल्याचे मान्य केलं.

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसारच समायोजन; सर्व माहिती पारदर्शक

मुंबई, दि.१६ : कोविड-१९ रुग्णासंदर्भातील माहिती विविध जिल्ह्यातील रुग्णालयांमधून पोर्टलवर भरण्यात येते. या माहितीत पारदर्शकता असावी आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल यांनी ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार कोविड बाधित मृत्यू प्रकरणांची कार्यवाही व्हावी अशी सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रारंभीपासून दिली असून त्यानुसारच हे समायोजन करण्यात आले आहे. शिवाय यामध्ये संपूर्ण पारदर्शकता राहावी म्हणून या माहितीचे समायोजन नियमितपणे केले जाणार आहे. यापूर्वी देखील दुबार नावे वगळण्याची कार्यवाही झाली होती.

१३ जून रोजीच सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकार्यांना यासंदर्भात त्यांच्या त्यांच्या अखत्यारीतील प्रयोगशाळांकडून अद्ययावत माहिती घेण्यास व ती भरण्यास सांगितले होते, त्यानुसार फेरतपासणी करून समायोजन केलेली माहिती ही वेबपोर्टलवर सार्वजनिक करण्यात येत आहे.

कोविडबाधित मृत्यू प्रकरणाची नोंद जागतिक तसेच राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांनुसारच; राज्य शासनानेच दिले होते समायोजनाचे आदेश
कोविडबाधित मृत्यू प्रकरणाची नोंद जागतिक तसेच राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांनुसारच; राज्य शासनानेच दिले होते समायोजनाचे आदेश

मुंबई, दि.१६ : कोविड-19 रुग्णासंदर्भातील माहिती विविध जिल्ह्यातील रुग्णालयांमधून पोर्टलवर भरण्यात येते.  राज्य शासन या माहितीची स्वत:हून फेरतपासणी करते. समायोजन केलेली माहिती ही वेबपोर्टलवर सार्वजनिक केली जाते. त्यामुळे आकडेवारीत वाढ दिसली तरी हेतूबाबत शंका घेण्याचे कारण असू नये, असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.

कोविड-19 विषाणुच्या प्रादुर्भावामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या नोंदी कमी संख्येने दाखविण्यात आल्याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. याबाबत राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सविस्तर माहिती देताना सांगितले की, जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर तसेच नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) यांनी ठरवून दिलेल्या ICD-10 मार्गदर्शक तत्वांनुसार कोविड बाधित मृत्यू प्रकरणांची कार्यवाही केली जाते. त्याचे पालन करणे बंधनकारक आहे, या आधारे तसेच राज्य शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे मार्च, 2020 पासून कोविड-19 प्रकरणाची पडताळणी करण्यात येत असून त्यानुसार समायोजन करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आलेली आहे. दि.11 जून रोजी राज्य शासनाने जिल्हा यंत्रणांना समायोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. 

राज्यात कालपर्यंत (दि.15 जुन 2020) 1 लाख 10 हजार 744 कोविड पॉझिटीव्ह रुग्ण असून त्यापैकी 50 हजार 554 ॲक्टीव्ह रुग्ण आहेत व 4 हजार 128 मृत्युंची नोंद घेण्यात आली आहे आणि 56 हजार 049 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. परंतु राज्य शासनाने या डाटामध्ये फेरतपासणी करुन मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आणखीन 862 मृत्यू आढळून आले असून राज्यात 466 मृत्यू आढळले आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये मृत्युसमयी कोविड अहवाल पॉझिटीव्ह आला होता व या सर्व प्रकरणांची नोंद डेथ इन कोविड पॉझिटीव्ह म्हणून घेण्यात आली आहे.

फेरतपासणीमध्ये राज्यात पुढीलप्रमाणे मृत्यू संख्या आढळली. अहमदनगर 1, अकोला 14, अमरावती 6, औरंगाबाद 33, बुलढाणा 2, धुळे 12, जळगाव 34, जालना 4, लातूर 3, नांदेड 2, नाशिक 28, उस्मानाबाद 3, पालघर 11, परभणी 1, पुणे 85, रायगड 14, रत्नागिरी 1, सांगली 4, सातारा 6, सिंधुदूर्ग 3, सोलापूर 51, ठाणे 146, वाशिम 1, यवतमाळ 1 अशी एकूण 466

कोविड बाधित मृत्युची संख्या, त्याबाबतचे विश्लेषण, दैनंदिन आरोग्य वार्तापत्रांतून देखील पारदर्शकपणे प्रसिद्ध करण्यात येत आहे. जन्म-मृत्यू नोंदणी कायदा 1969 च्या तरतुदीनुसार मृत्यू प्रमाणपत्रामध्ये उचित नोंद घेऊन प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येत असल्याचेही श्री.मेहता यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *