अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येला एक वर्ष :सीबीआयच्या तपासातून निष्पन्न काय झालं?-राष्ट्रवादीचा सवाल 

मुंबई ,१४ जून /प्रतिनिधी:- 

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या प्रकरणात ज्याप्रकारे राजकारण झाले ते सर्वांसमोर आहे. सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस करत असताना राजकीय कारणांमुळे या प्रकरणात बिहार सरकारने गुन्हा दाखल केला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला गेला. मात्र सीबीआयच्या तपासातून निष्पन्न काय झालं? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

सुशांतसिंग राजपूत प्रकरणामध्ये आत्महत्येशिवाय आणखी काही आहे का? याची आजपर्यंत सीबीआयकडून माहिती देण्यात आलेली नाही. एकंदर सुशांतसिंग राजपूतच्या नावाने भाजपला बिहार निवडणूक लढवायची होती, म्हणून सीबीआयला पुढे करुन महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान रचण्यात आले, असा आरोप ना. नवाब मलिक यांनी केला आहे. एका वर्षानंतर सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास झालेला नाही. जर त्याची आत्महत्या नव्हती, तर त्याचा मारेकरी कोण? हे सीबीआयने जनतेला सांगितले पाहिजे, अशी मागणी देखील मलिक यांनी केली आहे.