साई केंद्राला ३२ कोटी रुपये देणार -केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू
साईतील विविध साधनसामुग्री खरेदीसाठी पाच कोटी मंजूर
२७ कोटी खर्चून 300 खाटांचे वसतिगृह
औरंगाबाद, दिनांक 24 : साई येथील विविध कामांचे उद्घाटन आणि कोनशिला कार्यक्रमास येण्यापूर्वीच साईतील विविध क्रीडा प्रकाराच्या साहित्यासाठी पाच कोटी रूपयांची मंजुरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर याठिकाणी २७ कोटी खर्चून 300 खाटांचे वसतिगृह सुरू करण्यात येईल. शिवाय लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीचा सकारात्मकपणे विचार करताना याठिकाणी पदविका,पदवी अभ्यासक्रमाचा विचार करणार असल्या घोषणा केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी केली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने क्रीडा मंत्रालयाला दिलेल्या मागण्यांबाबतही सकारात्मक असून विद्यापीठास ‘खेलो इंडिया’तून निधी देणर असल्याचेही ते म्हणाले.
भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र येथे जलतरण तलाव, सिंथेटिक हॉकी टर्फचे उद्घाटन आणि तलवारबाजी सभागृहाच्या कोनशिला अनवारणाप्रसंगी श्री. रिजिजू बोलत होते. यावेळी सर्वश्री खासदार डॉ. भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील, आमदार अंबादास दानवे, आमदार अतुल सावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्राधिकरणाचे संचालक व्ही.पी. भांडारकर आदींची उपस्थिती होती.
मराठवाड्यातील खेळाडूंमध्ये अधिक क्षमता आहे. ही क्षमता अधिक वृद्धींगत करण्यासाठी औरंगाबादच्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राच्या माध्यमातून येथील खेळाडूंना अधिक प्रोत्साहन देत आगामी ऑलंपिक स्पर्धेत प्राधिकरणातील जवळपास 20 खेळाडू भारताचे प्रतिनिधीत्व करतील, असा आशावाद केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केला.
केंद्रीय मंत्री रिजिजू म्हणाले, औरंगाबाद मराठवाड्याची राजधानी आहे. अजिंठा, वेरूळसारखे जागतिक वारसा स्थळे येथे आहेत. येथील लोक संस्कृतीप्रिय, क्रीडा प्रेमी व मेहनती आहेत. या ठिकाणी राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राच्यामाध्यमातून धनुर्विद्या, मुष्टियुद्ध, भारोत्तोलन, जिम्नॅस्टिक, हॉकी आदी शाखांतून खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. देशात एका राज्यात एक खेळ या धर्तीवर विचार केला जात असताना, औरंगाबादेत मात्र सात क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन दिले जात आहे. येथील जिम्नॅस्टिक क्रीडा प्रकार बंद करण्यात आला होता. परंतु खासदार डॉ.कराड, खासदार जलील यांनी पाठपुरावा केल्याने या क्रीडा प्रकारास पुर्नमान्यता देण्यात आली. इतर देशांच्या तुलनेत आपली लोकसंख्या अधिक असूनही आपल्या देशाला ऑलंपिक खेळात पदके मिळत नाहीत, ती अधिकाधिक मिळावीत यासाठी शासनस्तरावरून मोठ्याप्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रात मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद येथे राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र तयार करण्यात आलेली आहेत. तसेच ‘खेलो इंडिया, फीट इंडिया’च्या माध्यमातून देश अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे, असेही श्री. रिजिजू म्हणाले.
खासदार जलील यांनी क्रीडा मंत्री श्री. रिजिजू यांच्याकडून क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देण्यासाठी योग्य सहकार्य मिळते. येथील साईच्या विकासात अधिक भर घालण्यासाठी अभ्यासक्रम सुरू करण्यात यावेत, अशी मागणी केली. खासदार डॉ. कराड यांनी मणीपूर येथील राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे उपकेंद्र याठिकाणी सुरू करण्यात यावे, अशी मागणी करत मराठवाड्यातील अधिकाधिक खेळाडू साईच्या माध्यमातून ऑलंपिकमध्ये मजल मारतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता पानसरे यांनी केले. आभार आमदार अंबादास दानवे यांनी मानले.
क्रीडा मंत्र्यांचा खेळाडूंशी संवादसुरूवातीला मल्टीपर्पज सभागृहात श्री. रिजिजू यांनी भेट देऊन तलवारबाजी, जिम्नॅस्टीक, भारोत्तोलन खेळाडूंशी संवाद साधताना त्यांच्या आहार व खेळाविषयी असणाऱ्या अपेक्षा जाणून घेतल्या.
आगामी ऑलंपिकमध्ये सुवर्णपदक प्राप्त करण्यासाठी मेहनत आणि योग्य प्रशिक्षण घेण्याबाबतही मार्गदर्शन केले. श्री. रिजिजू यांनी सिंथेटिक हॉकी स्टर्फ ग्राऊंडचे उद्घाटन केल्यानंतर हॉकीपटूंशी संवाद साधत खेळात थोडावेळ सहभाग घेतला.