परभणी जिल्ह्यातील एकही गाव नळपाणी पुरवठापासून वंचित राहणार नाही – पालकमंत्री नवाब मलिक
परभणी, दि.24 :- जिल्ह्यातील प्रत्येक गाव खेड्यातील राहणाऱ्या जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी शासनामार्फत “हर घर नल से जल” योजना हाती घेतली आहे. या योजनेपासून एकही गाव वंचित राहणार नाही अशी ग्वाही राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिली.
जल जीवन मिशन प्रस्तावित आराखड्याची बैठक पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. याबैठकीस आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार रत्नाकर गुट्टे, जिल्हाधिकारी दी. म. मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, पोलीस अधीक्षक जयंत मीना यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रत्येक व्यक्तीला दर दिवशी किमान 55 लिटर पाणी हे मिळाले पाहिजे. पाण्याच्या काटेकोर वापर व्हावा व जनतेला शुद्ध पाणी मिळावे यासाठी ही पाणीपुरवठा योजना असून या योजनेत नळाला तोट्या नसतील तर पाण्याचा अपव्यय रोखता येणार नाही. हे लक्षात घेऊन प्रत्येक खेड्यापाड्यात याबद्दल नागरिकांनी जागृकता बाळगावी, असे आवाहन पालकमंत्री नवाब मलिक यांनी केले.
सन २०१९ -२० मध्ये परभणी जिल्हयात चांगला पाऊस झाला. हे लक्षात घेता यावर्षी मुबलक पाण्याची उपलब्धता आहे. परभणी जिल्हयातील सन २०२०-२१ साठी ६८६०४ चे नळ कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट असून , आतापर्यंत ७२०३९ नळ कनेक्शन संकेतस्थळावर नोंद करण्यात आले असून , त्याची टक्केवारी १०५.०१ % आहे नळ कनेक्शनचे सन २०२०-२१ उदिष्ट पूर्ण झाले आहे . राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम जल जीवन मिशन अंतर्गत ३५ योजना मंजुर व प्रगतीपथावर असून , २ कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची आहेत . ७५ ते १०० % मध्ये -९ योजना आहेत. ५० ते ७५ % मध्ये -४ योजना आहेत . २५ ते ५० % मध्ये -३ योजना आहेत . ० ते २५ % मध्ये १६ योजना आहेत . तसेच वरील पैकी १८ योजनेव्दारे गावास पाणी पुरवठा सुरु केल्याची माहिती जिल्हाधिकारी दि. म. मुगळीकर यांनी दिली.
जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हयाचा सन २०२०-२१ साठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून , त्यामध्ये अ- वर्गवारी ५५ लिटर दरडोई प्रमाणे पाणी उपलब्ध होणारी २०५ गावे असून , ४० ते ५५ लिटर दरडोई प्रमाणे पाणी उपलब्ध होणारी ३१३ गावे आहेत व ब – वर्गवारी ४० लिटर पेक्षा कमी दरडोई प्रमाणे पाणी उपलब्ध होणारी १४० गावे आहेत . सदर कार्यक्रमांतर्गत अ- वर्गवारी मधील ५१८ पैकी १५४ गावांचे अंदाजपत्रके तयार केली आहेत त्यांची किंमत रु . ६२५.१४ लक्ष असून , ब – वर्गवारी मधील १४० गावांपैकी ९ गावांचे अंदाजपत्रके तयार केली आहेत त्यांची किंमत रु. २०.०३ लक्ष आहे. सदर अंदाजपत्रके १५ वा वित्त आयोग निधी अंतर्गत तयार करण्यात आलेली आहेत . संकेतस्थळावर नळ योजना नसलेली ४६ गावे आहेत . नळ योजना नसलेल्या ४६ गावांपैकी ७ गावात योजना असून , उर्वरीत ३ ९ गावांपैकी ७ गावांचे अंदाजपत्रके तयार करण्यात आली असून , त्यांची एकुण किंमत रु . २८७.४५ लक्ष आहे . सन २०२०-२१ मध्ये ३४ नवीन योजनांचे उदिष्ट असून त्यापैकी ९ योजनांची अंदाजपत्रके विभागास प्राप्त असून , तांत्रिक तपासणी करण्याचे काम प्रगतीत आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी प्रास्ताविकात दिली.