नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी १७२० कोटी निधी

मुंबई, दि. 10 : प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘नमो शेतकरी महा सन्मान’ निधी योजनेतील पहिल्या हप्त्यापोटी 1720 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली. याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित झाला आहे, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

निधीचे वितरण पीएफएमएस प्रणालीतून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केले जाणार आहे. पी.एम.किसान योजनेप्रमाणे ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचे मॉड्युल महाडीबीटी पोर्टलवर विकसित करण्याचे काम महाआयटीकडून गतीने सुरू आहे. तांत्रिक कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत, असेही मंत्री श्री. मुंडे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यंदाच्या अर्थसंकल्प मांडताना ही योजना जाहीर केली होती. या योजनेचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना या धर्तीवर ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत एप्रिल २०२३ ते जून २०२३ या कालावधीसाठीच्या पहिल्या हप्त्याला राज्य मंत्रिमंडळाने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला राज्य सरकारकडून वर्षाकाठी ६ हजार रुपये मिळणार आहेत. एप्रिल ते जुलै २०२३ कालावधीसाठी पहिला हफ्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारचे मिळून वर्षाला एकूण १२ हजार रुपये मिळणार आहेत.

काय आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना?

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेप्रमाणेच आहे. केंद्र सरकार दर तीन महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करते. त्याचप्रमाणे राज्य सरकार देखील दर तीन महिन्यांनी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. त्यामुळे राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाकाठी केंद्र सरकारचे सहा व राज्य सरकारचे सहा असे मिळून बारा हजार रुपये जमा होणार आहेत.