ईद-ए-मिलादच्या निमित्ताने सार्वजनिक सुट्टी जाहीर

मुंबई ,२७ सप्टेंबर /प्रतिनिधी :-उद्या गुरुवार (२८ सप्टेंबर) अनंत चतुर्दशी (गणेश विसर्जन) आणि ईद-ए मिलादचा साजरा होणार आहे. यामुळे राज्य सरकारने शुक्रवार २९ सप्टेंबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्याच निर्णय घेतला आहे.

ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या संदर्भात भेट घेऊन विनंती केली होती. राज्यात शांततेचे वातावरण असावं. तसंच पोलिसांच्या गर्दी तसंच मिरवणुकांचं नियोजन करता यावं. यासाठी २९ सप्टेंबर रोजी सुट्टी देण्याची विनंती या संघटनेकडून करण्यात आली होती. या शिष्टमंडळात खासदार राहुल शेवाळे, आमदार अबू आझमी, आमदार रईस खान, नसीन खान यांचा समावेश होता.

राज्याच्या विविध भागात गणपती विसर्जन आणि ईद ए मिलाद मिमित्ताने मिरवणुका काढण्यात येत असतात. दोन्ही सणांमुळे एकाच दिवशी निघणाऱ्या मिरवणुका यामुळे पोलीस प्रशासनावर ताण येण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन २९ सप्टेंबरची सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शांततेचं आवाहन

या दिवशी सर्व गुण्या गोविंदाने पार पडावं यासाठी मुख्यमंत्र्यांनी आवाहन देखील केलं आहे. अनंत चतुर्दशीनिमित्त गणरायाला आपण मनोभावे निरोप देऊ. विसर्जन मिरवणुकीतही नेमहीप्रमाणे शिस्त पाळावी आणि शांतता, सद्भावनेच्या वातावरणात गणेश विसर्जन पार पाडावं, असं आवाहन त्यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.

ईद-ए-मिलादच्या दिल्या शुभेच्छा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना ईद-ए-मिलादच्या दिल्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले की, ‘ईद-ए-मिलादचे उत्सव पर्व सौहार्द-सलोखा घेऊन येईल. यातून परस्परांतील आदर-प्रेमभाव आणि स्नेह वाढीस लागावा, अशा मनोकामना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. प्रेषित मोहम्हद पैगंबर यांनी जगाला त्याग आणि प्रेमाचा संदेश दिला. त्याचं जीवन हाच एक मोठा संदेश आहरे. त्यातून प्रेरणा घेऊन आपण परस्पर आदर-प्रेमभाव वाढील लावण्याचा प्रयत्न करुया, असं देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी शुभेच्छा देताना म्हटलं आहे.