“…तर एका क्षणात त्यांना भारतरत्न दिला असता”, अमिताभ बच्चन यांना भेटून ममता दीदींना झाला आनंद

मुंबई,३० ऑगस्ट /प्रतिनिधी :-देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या ‘इंडिया आघाडी’ची तिसरी बैठक मुंबईत पार पडत आहे. या बैठकीसाठी विरोधी पक्षातील देशभरातील नेते मुंबईत दाखल झाले आहेत. पश्चिम बंगालतच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील या निमित्ताने मुंबईत दाखल झाल्या आहेत. यावेळी त्यांनी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेली ममता बॅनर्जी यांनी त्यांना राखी बांधून त्यांना कोलकत्त्याला येण्याची देखील निमंत्रण दिलं.

यावेळी आमच्या खूप गप्पा झाल्या. अमिताभ यांनी कोलकत्त्यात आपल्या जीवनाची सुरुवात केली. अमिताभ बच्चन हेच आमच्यासाठी भारतरत्न आहेत. माझ्या हातात असतं तर मी एका क्षणात त्यांना भारतरत्न दिला असता, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

या भेटीदरम्यान ममता बॅनर्जी यांनी अभिनेते अमिताभ बच्चन यांना कोलकत्त्यात होणाऱ्या दुर्गा पुजा आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला येण्यासाठी आमंत्रण दिलं आहे. तसंच त्यांनी अमिताभ बच्चन यांना भेटून आनंद व्यक्त केला आहे.

राखी बांधून केले आदित्य ठाकरे अन् उद्धव ठाकरेंना औक्षण

आघाडीच्या बैठकीसाठी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत आल्या असून त्यांनी उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांना राखी बांधली आणि त्यांचे औक्षण केले.