महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळाची उलाढाल दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवावे – कृषी मंत्री धनंजय मुंडे

कृषी विभागाच्या भूखंडांवर शेतकरी व ग्राहकोपयोगी उपक्रम राबविणार

मुंबई,८ ऑगस्ट /प्रतिनिधी :-शेतकऱ्यांना लागणारी खते, कीटकनाशक, कृषी अवजारे तसेच शेतीमध्ये उत्पादित होणाऱ्या मालावरील प्रक्रिया उद्योग यामधील नाविन्यता शोधून महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाची उलाढाल पुढील वर्षापर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिनस्त असलेल्या महामंडळाच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. मंत्रालयात झालेल्या या बैठकीस कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, कृषी आयुक्त तथा महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील चव्हाण, उपमहाव्यवस्थापक सुरेश सोनवणे, सुजित पाटील, ज्योती देवरे, महेंद्र बोरसे, महेंद्र धांडे, देवानंद दुथडे, गणेश पाटील यांच्यासह महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

कृषीमंत्री श्री. मुंडे म्हणाले, महामंडळाची 13 विभागीय कार्यालये आणि 10 उत्पादन घटक कार्यरत आहेत. त्यामध्ये खत कारखाने, पशुखाद्य कारखाने, एम.आय.एल, कृषी अभियांत्रिकी कारखाना यांचा समावेश आहे. या कारखान्यांमध्ये उत्पादनासाठी आवश्यक कच्चा माल घटक केंद्र सरकारद्वारे नियंत्रित प्रमाणात वितरित केले जात आहे.

त्याचबरोबर महामंडळ आणि कृषी विभागाच्या अधिनस्त असलेल्या जागा विना वापर पडून असून काही ठिकाणी अतिक्रमण वाढत आहे. अशा जागांचा अभ्यास करून त्यावर शेतकरी आणि कृषी विभाग यांच्यासाठी उपयोगी ठरणारे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उत्पादने सुरू करण्याबाबत अभ्यास करून प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश मंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी दिले.

शेतमालाच्या सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक मूल्यसाखळ्यांच्या विकासासाठी ‘स्मार्ट’ने नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करावा – कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश

लहान, सीमांत शेतकरी तसेच कृषी नवउद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक मूल्यसाखळ्यांच्या विकासासाठी मदत करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) ने नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले

बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट)ची आढावा बैठक कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. यावेळी कृषि विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषि आयुक्त सुनिल चव्हाण, स्मार्टचे प्रकल्प संचालक कौस्तुभ दिवेगावकर, आत्माचे कृषि संचालक दशरथ तांभाळे, स्मार्टचे अतिरिक्त प्रकल्प संचालक ज्ञानेश्वर बोटे, कृषि विभागाचे उपसचिव संतोष कराड तसेच संबंधित इतर अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. मुंडे म्हणाले, पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये ‘स्मार्ट’ प्रकल्पासाठी उपलब्ध असलेल्या जागेवर शेतकऱ्यांसाठी फळ व भाजीपाला स्टॉल उपलब्ध करून  द्यावे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळेल. याचे एक मोबाईल ॲप तयार करावे. हे पुणे येथे यशस्वी झाल्यानंतर मुंबई, नवी मुंबई याठिकाणी राबविण्यात येईल. विदर्भ मराठवाड्यातील प्रमुख पिकांसाठी नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवण्यासाठी स्मार्टने नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करावा. बाजार जोडणीसाठी शेतकरी समुदाय आधारित संस्थांना संघटित खरेदीदारांशी प्रक्रिया उद्योग, निर्यातदार, संघटित किरकोळ विक्रेते यांच्याशी थेट जोडणी आणि कमीत कमी मध्यस्थांची संख्या असलेल्या कार्यक्षम मूल्य साखळ्या विकसित करण्यात याव्यात. कापसाबाबत एकजिनसी व स्वच्छ कापसाची निर्मिती करून निवडलेल्या जिनिंग मार्फत स्वतंत्र व वेगळ्या स्मार्ट कॉटन ब्रँड अंतर्गत मूल्यवृद्धी गाठी तयार करून त्याची ई-टेंडिंग प्लॅटफॉर्म मार्फत विक्री करावी. राज्यातील महिला सक्षमीकरणासाठी शेतकरी उत्पादक संस्थाना त्याची व्यवसायाभिमुख क्षमता बांधणी करण्यात यावी.

तसेच हवामान अंदाजाप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतमालाला पुढील वर्षी अंदाजित किती बाजारभाव मिळेल याविषयीही विभागाने अभ्यास करणे आवश्यक आहे. भविष्यात शेतकऱ्यांनी कुठले पीक घ्यावे यासाठी हे खूप महत्त्वाचे ठरणार आहे, असेही मंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी सांगितले.