सप्तश्रृंगी गडावरील घाट उतरताना बस ४०० फूट खोल दरीत कोसळली ; एका महिलेचा मृत्यू

नाशिक: नाशिकच्या सप्तशृंगी गड घाटात बसला झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. बस सप्तशृंगी गडावरून खामगावच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट दरीत कोसळली. या वणी बस अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण १८ प्रवासी जखमी आहेत. सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी बसचा अपघात झाला.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे अपघातस्थळी रवाना झाले आहेत. सप्तश्रृंगी गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरू झालं आहे. सर्व जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

अपघातग्रस्त बस खामगाव आगाराची असून काल सकाळी ८.३० वाजता ही बस सप्तशृंगी गडाच्या दिशेनं रवाना झाली होती. त्यानंतर बस सप्तशृंगी गडावर रात्री मुक्कामाला होती. त्यानंतर पुन्हा सप्तशृंगी गड ते खामगाव (बुलढाणा) असा बसचा प्रवास सुरू झाला होता.

अपघातग्रस्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही : पालकमंत्री दादा भुसे 

पालकमंत्री दादा भुसे यांनी, सप्तश्रृंगी घाटात एसटी बस अपघात झाला असून त्याची माहिती घेतली आहे आणि संबंधित यंत्रणेला सर्वोतपरी मदतीच्या सूचना दिल्या असल्याचे सांगितले. ते म्हणाले, अपघात ग्रस्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही. यासंबंधी यंत्रणेला सूचना दिल्या असून मी स्वतः संपर्कात आहे. सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आई सप्तशृंगी माता सर्वांना सुरक्षित ठेवो हीच प्रार्थना.

मृत्युमुखी महिलेच्या वारसाला राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे दहा लाख

जखमींवर शासकीय खर्चाने उपचार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिकमधील कळवण (नाशिक) येथे सप्तशृंगी गड घाटात एस टी बसच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला दहा लाख रुपयांची मदत राज्य मार्ग परिवहन (एस टी) महामंडळामार्फत देण्यात येणार आहे. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे घटनास्थळी दाखल झाले आहेत.

खामगाव आगाराची बस सप्तशृंगी गडावरून आज सकाळी खामगावच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट ४०० फुट दरीत कोसळली. बसमध्ये २२ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरू झालं आहे.

जखमी प्रवाशांना वणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींना प्राथमिक उपचार करून नाशिक येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.  पाच रुग्णांना नाशिक येथे हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

जखमी प्रवासी रूग्णांची मंत्री अनिल पाटील यांनी भेट घेऊन केली विचारपूस

सप्तश्रृंगी घाट येथे आज सकाळी झालेल्या बस अपघातातील प्रवासी रूग्णांची मंत्री अनिल पाटील यांनी भेट घेऊन विचारपूस केली. गंभीर जखमी रूग्णांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून शासनस्तवर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आज सकाळी कळवण येथे सप्तश्रृंगी घाटात एस टी बसला अपघात झाला. अपघातात एक महिला प्रवासी मृत झाली असून इतर जखमी 22 प्रवाशांना नाशिक जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मंत्री अनिल पाटील यांनी आज उपचारार्थ दाखल केलेल्या 22 रूग्णांची भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी समवेत प्रभारी जिल्हा चिकित्सक डॉ.अरूण पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निलेश पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, वैद्यकीय महाविद्यालयाचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. गोपाळ शिंदे, अतिदक्षता कक्षाचे डॉ. प्रतिक भांगरे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एकूण 22 प्रवासी रूग्णांवर शासकीय खर्चात उपचार करण्यात येत आहेत. दाखल केलेल्या रूग्णांपैकी अतिदक्षता कक्षात 3 रूग्ण असून आपत्कालिन कक्षात 19 रूग्ण असल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली.