देवेंद्र फडणवीस यांची तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी करणे बरोबर नाही-भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, १४ जून / प्रतिनिधी :- सध्या राज्यात सर्वत्र चर्चा सुरु आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या १३ जून रोजी छापून आलेल्या जाहिरातीची. या जाहिरातीत फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो होता. या जाहिरातीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो नसल्यानं तसंच फडवीसांपेक्षा शिंदे यांना राज्याच्या जनतेची जास्त पसंती असल्याचं दाखवल्यानं भाजप कार्यकर्ते नाराज झाले होते. यावरुन युतीत खडा पडतो का काय? अशी चर्चा सुरु होती. या जाहिरातीवरुन सेना भाजपात मतभेद असल्याच्या चर्चा जोर धरताना दिसत आहेत. यावर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

१३ जून रोजी छापून आलेल्या जाहिरातीवर स्पष्टीकरण देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, कार्यकर्त्यांच्या मनाविरुद्ध होतं तेव्हा कार्यकर्ते विरोधातही प्रतिक्रिया देत असतात. देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी पक्षवाढीसाठी काम केलं आहे. त्यामुळे कार्यकर्ते चिडले आहेत, त्यांची मनं तुटली आहेत. कालची जाहिरात कोणी दिली ते अजून समोर आलं नाही. देवेंद्र फडणवीस यांची तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी करणे बरोबर नाही. यामुळेच कार्यकर्त्यांनी अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. असं बावनकुळे म्हणाले आहेत. याविषयी पढे बोलताना ते म्हणाले की , एकनाथ शिंदे एवढ्या कोत्या मनाचे नाहीत, त्यामुळे ते असं करणार नाहीत. शिंदे-फडणवीस सरकार चांगले चालले असून मिठाचा खडा कोण टाकत आहे ते पाहणार आहे. तसंच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या विषयी चर्चा करणार असल्याचं बावनकुळे म्हणाले आहेत.

आज छापून आलेल्या जाहिरातीवर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही जाहिरात त्यांचा गट म्हणून छापली असून चांगल्या भावनेने दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. कालच्या जाहिरातीत कोणीतरी खोडसाळपणा केला होता, तो आज दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. ही युतीसाठी चांगली गोष्ट आहे. आमच्याकडून चूक झाल्यास आम्ही दुरुस्त करणार त्यांच्याकडून झाली तर ते करणार. कोणी छोट व्हावं कुणीतरी मोठं व्हाव. आमच्यात मतभेद असतील पण मनभेद नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

तसंच एकनाथ शिंदे हे आमचं नेतृत्व करत असून आम्ही त्यांच्या नेतृत्वार विश्ववास ठेवला आहे. केंद्रीय नेतृत्वानं देखील त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. तसंच आम्हाला त्यांचा पक्ष सांभाळायची गरज नसून ते त्यांचा पक्ष व्यवस्थित सांभाळ आहेत. असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केलेल्या टीकेवर बोलताना संजय राऊत यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आमचे आमदार नितेश राणे आहेत. त्यामुळं आम्ही त्यावर बोलणार नसल्याचं ते म्हणाले आहेत.