मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही ; वैजापूर तालुक्यातील १५० ग्रामपंचायत सदस्य अपात्र
वैजापूर ,३ जून/ प्रतिनिधी :- मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या जिल्ह्यातील ११९८ ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरवले आहे. त्यामध्ये वैजापूर तालुक्यातील १५० सदस्यांचा समावेश असून अपात्र ठरवण्यात आलेल्या सदस्यांमध्ये काही गावचे सरपंच, उपसरपंच यांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६१७ ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया १८ जानेवारी २०२१ रोजी पुर्ण झाली होती.या निवडणुकीत राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र उमेदवारी अर्जासोबत सादर करणे आवश्यक होते.राखीव जागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती, भटक्या विमुक्त जमाती,इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश आहे. ज्या उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नाही.त्यांनी तसा प्रस्ताव समाज कल्याण विभागाच्या पडताळणी समितीकडे सादर करणे आवश्यक होते.तशी प्रस्ताव दाखल केल्याची पावती अर्जासोबत सादर करणे आवश्यक होते.त्यानंतर निवडून आलेल्या दिनांकापासून बारा महिन्याच्या आत वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.परंतु कोवीडमुळे वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात उमेदवारांना विलंब झाला होता.त्यांना विशेष बाब म्हणून शासनाने १७ जानेवारी २०२३ पर्यंत मुदतवाढ दिली होती.परंतू तरीही बहुतांश उमेदवारांनी मुदतीत वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही.त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम १०-१ अ व कलम ३०-१ अ मधील तरतुदीनुसार ११९८ सदस्यांना अपात्र ठरविण्यात असून त्यामध्ये वैजापूर तालुक्यातील १५० सदस्यांचा समावेश आहे.