जितेंद्र आव्हाडांना ‘ते’ वक्तव्य भोवले ; उल्हासनगरमध्ये गुन्हा दाखल

उल्हासनगर :-राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. यामुळे आव्हाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सिंधी समाजाबद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप जिल्हा अध्यक्ष जमनू पुरस्वामी यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सिंधी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची तक्रार दिली आहे. या तक्रारीनंतर आव्हाड यांच्यावर उल्हासनगर हील लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांनी २७ मे रोजी उल्हासनगरच्या नेताजी चौक परिसरात राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत सिंधी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.

आव्हाड यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन ठाण्यातील सिंधी समाज आक्रमक झाला असून त्यांनी आव्हाड यांच्याविरोधात एकत्र येत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाण्यातील कोपरी परिसरात मोठ्या संख्येने सिंधी बांधव वास्तवाला आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी उल्हासनगरमधील कार्यक्रमात सिंधी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप सिंधी समाजाकडून करण्यात येत आहे. ठाण्यातील सिंधी बांधवांनी कोपरीमधील शंकर मंदिरात एकत्र येत आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

यावेळी जोपर्यंत जितेंद्र आव्हाड माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांच्या घरावर मोर्चा काढणे, कोपरी बंद ठेवणे, जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्तांना निवेदन देणे, या संविधानिक मार्गाने निषेध नोंदवण्याच निर्णय सिंधी समाजाकडून घेण्यात आला आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह कोपरीमधील सिंधी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.