एके दिवशी मुंबईचे महत्त्व कमी होईल आणि गुजरातला आर्थिक राजधानी घोषित केले जाईल – जयंतराव पाटील

मुंबई,२१ मार्च  /प्रतिनिधी :-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी लाख म्हणोत की, महाविकास आघाडी सरकार असताना आमच्यावर अन्याय झाला मात्र महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातच मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खात्याच्या माध्यमातून अनेकांचे ‘कल्याण’ केले, असा थेट हल्लाबोल माजी जलसंपदा मंत्री आ. जयंतराव पाटील यांनी केला. विरोधकांच्या २९३ च्या चर्चेवर बोलताना शिंदे सरकारच्या भ्रष्टाचारावर त्यांनी जोरदार टीका केली.

महाराष्ट्र शासनाचे नगरविकास खाते हे शासनाच्या कारभारातील अत्यंत महत्त्वाचे खाते आहे. मुख्यमंत्री महोदय स्वतः गेल्या ७-८ वर्षांपासून या खात्याचा कारभार हाकत आहेत, याकडे सभागृहाचे लक्ष जयंत पाटील यांनी वेधले.

नगरविकास खात्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे मुंबई शहर आहे. अनेकांसाठी ही मुंबई पोट भरणारी आहे, अनेकांसाठी ती घर आहे, अनेकांसाठी ती लक्ष्मी आहे, अनेकांसाठी स्वप्न आहे तर अनेकांसाठी माय आहे हे देखील जयंतराव पाटील यांनी आवर्जून सांगितले.

राज्यात सत्तांतर झाले आणि मुंबई खुल्या तिजोरीसारखी आपल्याला मिळाली अशी भावना सत्ताधाऱ्यांच्या मनात जागृत झाली आहे, असा थेट आरोपही त्यांनी केला.

मागील मुंबई मनपा निवडणुकीत साम, दाम, दंड, भेद या सर्व गोष्टींचा वापर करून शिवसेनेला मनपा निवडणुकीत चितपट करण्याचा डाव त्यांच्या मित्रांनी आखला होता, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

मुंबई महापालिकेकडे काही ठेवी आहेत. त्या ठेवींवर सत्ताधाऱ्यांचा डोळा आहे. १२ हजार कोटी रुपये महापालिकेच्या ठेवीमधून काढण्याची तरतूद महापालिकेच्या बजेटमध्ये करण्यात आली आणि पालिकेच्या तिजोरीवर हात मारला गेला असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

मुंबई सुशोभीकरणाच्या नावाखाली तुम्ही ज्या गोष्टी चांगल्या होत्या त्याचीही तोडफोड करून नवी कामे सुरू केली. गरज नाही तिथे खर्च केला जात आहे अशी टीकाही जयंतराव पाटील यांनी केली.

स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे या मुंबई शहरावर प्रचंड प्रेम होते. मुंबईची सत्ता भाजपच्या हातात देणे हे हिंदुहृदयसम्राट य बाळासाहेब ठाकरे यांना पटले नसते. मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हे काम होत आहे. मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा नियोजनबद्ध कार्यक्रम आखला जात आहे असा हल्लाबोलही जयंत पाटील यांनी केला. अनेक महत्त्वाची कार्यालये व प्रकल्प गुजरातकडे नेण्यात आले असा थेट आरोपही त्यांनी केला.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे पण ज्याप्रमाणे निर्णय घेतले जात आहेत त्याप्रमाणे एके दिवशी मुंबईचे महत्त्व कमी होईल आणि गुजरातला आर्थिक राजधानी घोषित केले जाईल की काय अशी भीती त्यांनी बोलताना व्यक्त केली.

गुजरातला मुंबईविषयी आकस असणे स्वाभाविक आहे. मुंबई गुजरातला मिळाली नाही याचे त्यांना दुःख आहे असा टोला लगावतानाच या मुंबईसाठी १०५ हुतात्म्यांनी हौतात्म्य पत्करले आहे याची आठवणही जयंत पाटील यांनी करुन दिली.

मुंबईतील सुशोभीकरण प्रकल्प हे कार्यक्रम, इव्हेंट करण्यासाठी आहेत का, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.