कसबा- चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध होणार?

महाविकास आघाडी ठाम! मुख्यमंत्र्यांचा फोन, राज ठाकरेंचं पत्र

मुंबई ,​५​ फेब्रुवारी  / प्रतिनिधी :- कसबा, चिंचवड पोटनिवडणुकी संदर्भात मनसेची उद्या सकाळी 10 वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे. कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना फोन केला. याशिवाय राज ठाकरे यांनीही पोटनिवडणुकांमध्ये महाविकासआघाडीने उमेदवार देऊ नये, असं पत्र लिहिलं आहे.
  
भाजपकडूनही या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, पण काँग्रेस या दोन्ही निवडणुका लढण्यावर ठाम आहे. उद्या सकाळी 10 वाजता मनसेची अधिकृत भूमिका जाहीर होण्याची शक्यता आहे, तर चिंचवड पोटनिवडणुक बिनविरोध करण्यासाठी राज ठाकरेंकडून आवाहन करण्यात आलंय. त्यामुळे कसब्या संदर्भात राज ठाकरे काय निर्णय घेणार ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची घोषणा केली आहे. चिंचवडमधून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप तर कसब्यामधून हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. “घरातला उमेदवार दिला गेला नाहीये. राज ठाकरेंनी पत्र लिहिलं आहे, पण कोणाची वकिली चालण्याचं कारण नाही. एकनाथ शिंदे बोलतात त्याच्या विरोधात फडणवीस वागतात,” असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला आहे. कसब्याची जागा काँग्रेस लढवणार आहे, आम्ही भूमिका मांडू. चिंचवडची जागा राष्ट्रवादी लढवेल, तिथे काय निर्णय होणार ते राष्ट्रवादीला विचारा, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.
 
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या महाविकासआघाडीकडून अर्ज भरण्यात येणार असल्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. “एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. मी म्हणलं चर्चा करू. काल भाजपची उमेदवारी जाहीर झाली, टिळकांना डावललं गेलं. आता मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावाला अर्थ नाही. पुण्यात पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहतील.” असं नाना पटोले यांनी सांगितलं.