कोविड नियमांचे पालन करता येत नसेल तर भारत जोडो यात्रा थांबवा

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे राहुल गांधींना पत्र

नवी दिल्ली : संपूर्ण जगावर पुन्हा एकदा कोरोना या जीवघेण्या व्हायरसचे संकट घोंगावू लागले आहे. फक्त चीनच नव्हे तर जपान, दक्षिण कोरिया, ब्राझिल आणि अमेरिका या देशांमध्येदेखील कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे भारताने सावध होत उपाययोजना आखायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी राहुल गांधींना पत्र लिहित भारत जोडो यात्रेत कोविड नियमांचे पालन करता येत नसेल तर यात्रा थांबवण्याचे आवाहन केले आहे.

मांडवीया यांनी राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहित भारत जोडो यात्रेत कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.मांडवीया यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान कोरोनाच्या प्रसारावर चिंता व्यक्त केली आहे. मांडवीया यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोना महामारी ही सार्वजनिक आपत्ती आहे. त्यामुळे देशहितासाठी भारत जोडो यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेता येईल. राजस्थानमध्ये सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेत कोरोनाच्या नियमांचे पालन करावे. तसेच यात्रेदरम्यान सर्वांनी मास्क आणि सॅनिटायजरचा वापर करावा. भारत जोडो यात्रेत फक्त कोरोना वॅक्सीन घेतलेल्या नागरिकांना सहभागी होण्याची परवानगी द्यावी.

यावरून आता काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट केले की, “राजस्थानमध्ये भारत जोडो यात्रा ही २१ डिसेंबरला पार पडली. मात्र, येथे जमलेल्या गर्दीला हे केंद्र सरकार एवढे घाबरले की, २० डिसेंबरला त्यांनी राजस्थानमध्ये कोरोना नियमांचे पालन करण्याचे पत्र राहुल गांधींना लिहिले. वाढत्या जनसमर्थनाच्या भीतीने भारत जोडो यात्रेला खीळ घालण्याचा भाजपचा हेतू असल्याचे यावरून स्पष्ट होते. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी त्रिपुरामध्ये एक रॅली केली, तिथे कोरोना नियमांचे पालन केले गेले नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पंतप्रधानांनी बंगालमध्ये मोठ्या रॅली काढल्या. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे उद्दिष्ट राजकीय नसेल आणि त्यांची चिंता रास्त असेल, तर त्यांनी पहिले पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहायला हवे.”

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले की, “आरोग्यमंत्र्याच्या पत्रावरून भारत जोडो यात्रेला भाजप किती घाबरली आहे हे दिसून येते. डोनाल्ड ट्रम्पला नमस्ते म्हणताना, मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार पाडताना, बंगालमध्ये प्रचार करताना, तेव्हाच्या आरोग्य मंत्र्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा सल्ला देण्याची हिंमत दाखवली असती तर देशात कोरोना वाढला नसता. यात्रा योग्य दिशेने सुरु आहे हे स्पष्ट केले आहे.”