लोकसहभागाच्या माध्यमातून मुंबई भारतातील सर्वात सुंदर शहर बनविणार – पालकमंत्री दीपक केसरकर

‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’अभियानासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई ,१ डिसेंबर  / प्रतिनिधी :- मुंबईला सर्वात स्वच्छ, सुंदर आणि निरोगी शहर बनविण्याचा शासनाचा निर्धार आहे. हा निर्धार लोकसहभागाच्या माध्यमातून पूर्ण करणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानाचे उद्घाटन मंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते जी – नॉर्थ कार्यालय परिसरात करण्यात आले. यावेळी स्थानिक आमदार सदा सरवणकर, मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त चंदा जाधव, उपायुक्त रमाकांत बिरादार, सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे आदी उपस्थित होते. हे अभियान १ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, मुंबई आर्थिक राजधानीचे शहर असल्याने देशभरातून लोक येथे येतात. यामुळे सार्वजनिक व्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी महानगरपालिकेवर असून, ते ती पूर्ण करीत आहे. तथापि, हे शहर स्वच्छ राखण्याची जबाबदारी केवळ महानगरपालिकेची नसून यासाठी लोकसहभाग देखील महत्त्वाचा आहे. याकामी शासनाचे सर्व विभाग सहकार्य करतील, असे त्यांनी सांगितले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी परिसरात येणाऱ्या नागरिकांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका दरवर्षी देत असलेल्या सुविधांचे तसेच महानगरपालिकेच्या कामगारांशी संवाद साधून त्यांच्या कामाचे कौतुक केले.

सर्वसामान्यांसाठी रोजगार निर्मितीवर भर

मुंबई शहराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यात येणार आहे. याअंतर्गत कोळीवाडे, धार्मिक आणि सांस्कृतिक वैभव असलेल्या परिसरांचे सौंदर्यीकरण, पायाभूत सुविधांचा विकास यावर भर देण्यात येत आहे. मुंबईकरांना विविध प्रकारचे अन्नपदार्थ चाखायला मिळावेत तसेच सर्वसामान्यांना अधिक रोजगार मिळावा, यासाठी दक्षिण मुंबईतील काही भागांत फूड कोर्ट निर्माण करण्यात येणार आहेत. हे करीत असताना स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

आजारांचे मूळ अस्वच्छतेत असल्यामुळे प्रत्येकाने स्वच्छतेची सुरूवात स्वत:पासून करावी, असे आवाहन आमदार सदा सरवणकर यांनी केले. तर उपायुक्त श्री. बिरादार यांनी स्वच्छता अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली. श्रीमती जाधव यांनी स्वच्छतेसाठी लोकप्रतिनिधींच्या सूचनेनुसार महानगरपालिकेमार्फत उपाययोजना केल्या जातील, याबाबत आश्वस्त केले. ‘सिटी ऑफ लॉस एंजेलिस’ या महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. एड्स नियंत्रण दिनाचे औचित्य साधून मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेमार्फत ‘मितवा’ या पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’अभियानासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानाच्या माध्यमातून आपण सर्वजण मिळून मुंबई  अधिक सुंदर करुया असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. मुंबई उपनगर जिल्ह्यातील वांद्रे व एच ईस्ट वॉर्ड येथे ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियान शुभारंभप्रसंगी मंत्री श्री. लोढा बोलत होते.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, आज पासून एक महिनाभर आपण हे अभियान राबवत आहोत. स्वच्छता ही सवय आहे, ती फक्त एक किंवा दोन दिवसांकरीता नाही तर रोजच आपल्याला आपला परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. रोगराई होऊ नये, यासाठी आपला परिसर अधिक स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया.

पालकमंत्री श्री. लोढा म्हणाले की, पंधरा वॉर्डमधील स्थानिक लोकप्रतिनिधी, शासनाचे सर्व विभाग, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना तसेच नागरिकांनी या अभियानात श्रमदान करून ते यशस्वी करावे. या अभियान कालावधीत प्रत्येकाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तसेच सुट्टीच्या दिवशी शनिवार, रविवारी श्रमदान करा. आपला परिसर, शाळा, महाविद्यालय, पोलीस स्टेशन, सार्वजनिक ठिकाणे, सागरी किनारे यांची स्वच्छता करा, असे आवाहन पालकमंत्री श्री. लोढा यांनी केले.

यावेळी सर्वांनी मिळून स्वच्छतेची शपथ घेतली. एच ईस्ट वॉर्ड येथे आमदार पराग अळवणी, वांद्रे येथे मुंबई उपनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी विकास नाईक, जिल्हा नियोजन अधिकारी भूषण देशपांडे व अन्य शासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.