सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा मराठमोळे सरन्यायाधीश

वडिलांनंतर मुलगा बनला भारताचा ‘सरन्यायाधीश’

नवी दिल्ली : न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी आज देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती चंद्रचूड यांना पदाची शपथ दिली. यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखर, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आदी उपस्थित होते.

न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी निवृत्त सरन्यायाधीश यू यू लळीत यांची जागा घेतली आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड हे १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत दोन वर्षांसाठी या पदावर असणार आहेत. १९७८ ते १९८५ या काळात ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.

न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे वडील न्यायमूर्ती वायव्ही चंद्रचूड २ फेब्रुवारी १९७८ ते ११ जुलै १९८५ या काळात भारताचे १६ वे सरन्यायाधीश होते. न्यायव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच पिता-पुत्र सरन्यायाधीश बनले आहेत. न्यायमूर्ती चंद्रचूड हे देशातील पुरोगामी आणि उदारमतवादी न्यायाधीश म्हणून ओळखले जातात. नागरिकांच्या मूलभूत हक्कांबाबतही ते अत्यंत संवेदनशील मानले जातात.

देशाचे मावळते सरन्यायाधीश उदय लळित यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सरन्यायाधीश म्हणून धनंजय चंद्रचूड रुजू झाले आहेत. त्यांना १३ मे २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून पदोन्नती मिळाली. त्यांनी याआधी अयोध्येतील बाबरी मशीद तसेच गोपनियतेचा अधिकार यासह अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये न्यायदानाचे काम केलेले आहे.

कोण आहेत धनंजय चंद्रचूड?

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९५९ रोजी मुंबईत झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून एलएलबी केले. १९९८मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून नामांकन मिळाले. ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. त्यांना १३ मे २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश बनवण्यात आले. ते सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश आहेत. सबरीमाला, समलैंगिकता, आधार आणि अयोध्याशी संबंधित खटल्यांच्या सुनावणीत त्यांचा सहभाग आहे.