अतिवृष्टीने बाधित शेतपिकांची पालकमंत्री अतुल सावे यांनी केली पाहणी
रायमोह मंडळातील दुर्दैवी कुटुंबियांचे केले सांत्वन
बीड,२२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केली आज जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेट देऊन अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतपिकांची पाहणी केली.
पालकमंत्री अतुल सावे यांनी आज शिरूर का. तालुक्यातील रायमोह मंडळात ढगफुटी सदृश्य अतिमुसळधार पावसानंतर झालेल्या दुर्दैवी घटनेतील पीडीत कुटुंबीयांची भेट घेतली व सांत्वन केले. भानकवाडी येथील कुंडलिक सोनसळे यांच्या दोन मुली व एक ३० वर्षीय सिरसमार्ग येथील पाहुणा साईनाथ भोसले वाहून गेला होता. तसेच दगडवाडी येथील रावसाहेब जायभाये शेतामध्ये असताना अंगावर वीज कोसळल्याने ते जागीच ठार झाले होते. त्यांनी या दुर्दैवी जायभाय व सोनसळे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. शासनाच्या वतीने जायभाय कुटुंबाला चार लक्ष रु व सोनसळे कुटुंबाला आठ लक्ष रुपये मदतीचा धनादेश देण्यात आला. याप्रसंगी खासदार डॉ. प्रितमताई मुंडे, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
मु.भानकवाडी, ता.रायमोह, जि.बीड येथील २ मुली पुरात वाहून गेल्याने गावात शोककळा पसरली आहे.खा.प्रीतमताई मुंडे यांच्यासह श्री.कुंडलिक एकनाथ सोनसळे यांची सांत्वनपर भेट घेतली. या मुलींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाखांचे आर्थिक सहकार्य देण्यात आले.आपल्या कुटुंबातील मुलींना गमावणे अत्यंत क्लेशकारक असल्याचे मत पालकमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केले.
पालकमंत्री श्री सावे यांनी दगडवाडी व भानकवाडी शिवारात अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतपिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी जि.प. सदस्य वैजिनाथ मिसाळ, उपविभागीय अधिकारी नामदेव टीळेकर, तहसीलदार ( शिरूर ) श्रीराम बेंडे, तसेच राजेंद्र मस्के, नवनाथ शिराळे, रामदास बडे, जालिंदर सानप, संभाजी जाधव, वसंतराव सानप, सुभाष क्षीरसागर, यांच्यासह संबंधित अधिकारी, भाजपा पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सावे यांच्या उपस्थितीत आज जिल्ह्यातील माजलगाव येथील मेळाव्यानंतर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली व बीड येथील शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकारी यांची भेट व चर्चा केली.