आता ६ एअरबॅग्ज बंधनकारक; गडकरींची घोषणा

पुढील वर्षी १ ऑक्टोबर २०२३ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार

नवी दिल्ली : चालकाच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रवाशी कारमध्ये सहा एअरबॅग्ज बंधनकारक करणार असल्याची घोषणा नुकतीच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. त्यानुसार आता पुढील वर्षी १ ऑक्टोबर २०२३ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

गडकरी म्हणाले, मोटार वाहनांची किंमत आणि प्रकार विचारात न घेता त्यातून प्रवास करणार्‍या सर्व प्रवाशांची सुरक्षितता ही आपली सर्वोच्च प्राथमिकता आहे. ऑटो उद्योगाला भेडसावणाऱ्या जागतिक पुरवठा साखळीतील अडचणी आणि त्याचा व्यापक आर्थिक परिस्थितीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन १ ऑक्टोबर २०२३ पासून पॅसेंजर कार्समध्ये (एम-१ श्रेणी) किमान ६ एअरबॅग अनिवार्य करण्याच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी टाटा सन्सचे माजी चेअरमन आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे कार अपघातात निधन झाले. त्यांच्या मृत्यूचा सखोर तपास केल्यानंतर ही बाब समोर आली की त्यांची मर्सिडीज कार ही १०० किमी प्रतितासहून अधिक वेग होता. तसेच त्यांच्या कारमध्ये चार एअरबॅग्ज होत्या. ज्या प्रामुख्याने चालक आणि त्याच्या शेजारी बसणाऱ्या व्यक्तीचे संरक्षण करु शकतात. पण मागे बसलेल्या प्रवाशांची यामुळे सुरक्षा होत नाही. मिस्त्री यांच्या निधनानंतर भारतातील कारमधील एअरबॅग्जचा मुद्दा प्रकर्षाने चर्चिला गेला.

त्यानंतर केंद्रीय वाहतूक मंत्री असलेल्या नितीन गडकरी यांनी याबाबत कार निर्मिती कंपन्यांना एअरबॅग्जबाबत थेट जाबच विचारला. कार निर्मिती कंपन्या परदेशात विकणाऱ्या कार्ससाठी आणि भारतात विकणाऱ्या कार्ससाठी वेगवेगळे सुरक्षा विषयक नियम अबलंबतात. यामध्ये एकाच कंपनीच्या एकाच मॉडेलच्या कारमध्ये भारतात चार तर परदेशात सहा एअरबॅग्ज असतात.