मग तुम्हाला पेंग्विन सेना म्हणायचे का ?-आ. आशिष शेलारांचे ठाकरेंना चोख प्रत्युत्तर

मुंबई ,३ सप्टेंबर /प्रतिनिधी :- ‘उद्धव ठाकरेजी आपण आमच्या कमळाला हिणवण्यासाठी ‘कमळाबाई’ म्हणत आहात ? तुम्ही तसे म्हणत असाल तरी हरकत नाही. मग त्याच पार्श्वभूमीवर आम्हीही तुमच्या उरल्या सुरल्या पक्षाला पेंग्विन सेना म्हणायचे का ? ‘ असे खोचक शब्दांत मुंबई भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. आज सामनामधून भाजपवर करण्यात आलेल्या टीकेचा शेलारांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
 
 
अस्सल शब्द आमच्याकडेही आहेत
सामानातील टीकेवर प्रत्युत्तर देताना शेलार म्हणाले की, ‘ उद्धवजी, आपण आमच्या कमळाला हिणवण्यासाठी ‘कमळाबाई’ म्हणताय ? हरकत नाही, बाई या शब्दांतही आई – ताई आणि कडक लक्ष्मी सामावलेली आहे. ज्याप्रकारे तुम्ही भाजपवर टीका करत आहात तसेच भाजपही करू शकतो. त्यामुळे तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला आता आम्ही पेंग्विन सेना म्हणायचे का ? ‘ असा सवाल आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे. तसेच ‘असे कडक अस्सल मुंबईकर शब्द आमच्याकडे देखील आहेत.’ असा इशारा देखील त्यांनी ठाकरेंना दिला आहे.