नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

यवतमाळ, २०​ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असा दिलासा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज दिला.

यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथे अभिमान लक्ष्मण बोभाटे यांच्या शेतात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासोबत आमदार अशोक उईके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, तहसीलदार रविंद्र कानडजे, गटविकास अधिकारी बी. के. पवार, रंजन कोल्हे तसेच स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

कृषी मंत्री यांनी स्थानिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले व खरडून गेलेल्या शेतात आता लवकर पीक घेता येणार नसल्याने होणाऱ्या नुकसानीची  जाणीव असल्याचेही त्यांनी सांगितले. या सर्व बाबींचा विचार करून शासनाकडून मदत करण्यात येईल याबाबत त्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले. शेतात घुसणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी स्थानिक स्तरावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी आमदार अशोक उईके यांनी राळेगाव तालुक्यात झालेल्या नुकसानीची माहिती कृषी मंत्री यांना दिली. तहसीलदार रवींद्र कानडजे यांनी नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनाकडे सादर केला असल्याचे सांगितले.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून देणार – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून देणार – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

अमरावती: अतिवृष्टीबाधित  शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून देण्यात येईल. शासन अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास कृषी  मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज व्यक्त केला .

कृषी  मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज धामणगाव रेल्वे तालुक्यातील मौजा बोरगांव धांदे, मौजा रायपूर (कासारखेड ), मौजा इसापूर तसेच मौजा भातकुली येथील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर जावून

शेतकरी, ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधला, त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते.

कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रादेशिक संशोधन केंद्राच्या प्रमुख वर्षा टापरे, महसूल उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, धामणगाव रेल्वे तालुका कृषी अधिकारी राजेश वालदे , उपविभागीय कृषी अधिकारी माणिक त्र्यंबके तसेच अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

श्री. सत्तार म्हणाले, अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे, या कामात कुठलीही हयगय होता कामा नये. बांधावर जाऊन उर्वरित पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करावी. येत्या आठवडाभरात शेतकर्‍यांना त्यांच्या शेतीच्या  नुकसानाची भरपाई मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला .

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून नुकसानग्रस्त भागाची माहिती घेतली.

धामणगाव रेल्वे तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 63932.71 हेक्टर आहे. सर्वसाधारण पेरणी खालील क्षेत्र 55323.20 हेक्टर एवढे आहे. सद्यस्थितीत तालुक्यामध्ये खरीप हंगामामध्ये 54302. 00 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. आतापर्यंत तालुक्यात एकूण 777.90 मिमी (133.7 टक्के ) पावसाची नोंद झालेली आहे. जून- जुलै महिन्याचे सर्वसाधारण पर्जन्यमान झालेले आहे. जुलै महिन्यातील सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे अंदाजे 44104.00 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे .

मौजा बोरगांव धांदे येथील सोयाबीन, कापूस व तूर पीकांचे एकूण बाधित क्षेत्र 603 हेक्टर असून नुकसानीची टक्केवारी 94.81 टक्के आहे. मौजा रायपूर (कासारखेड ) सोयाबीन, कापूस आणि तूर पीकांचे बाधित क्षेत्र 193 हेक्टर असून नुकसानीची टक्केवारी 93.05 टक्के एवढी आहे. मौजा इसापूर येथील सोयाबीन, कापूस आणि तूर पीकांचे बाधित क्षेत्र 196 हेक्टर असून नुकसानीची टक्केवारी 89.50.0 टक्के एवढी आहे. मौजा भातकुली येथील सोयाबीन, कापूस, तूर आणि इतर पीकांचे बाधित क्षेत्र 383 हेक्टर असून नुकसानीची टक्केवारी 95 टक्के एवढी आहे.

कृषीमंत्र्यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

दुष्काळ पीडित शेतकऱ्याच्या भावना समजून घेवून त्यांचे मनोबल वाढवा – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

नागपूर.: अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे ज्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहेत. त्या भागाचा सर्वे करा. पंचनामे करा, त्यांच्या भावना समजावून घेवून त्यांचे मनोबल वाढविण्याच्या प्रयत्न करा, अशा सूचना राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

नागपूर ग्रामीण मधील मौजा पांझरीलोधी व वारंगा येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी कृषी मंत्र्यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते.  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे, नायब तलसीलदार सचिन शिंदे, नियोजन मंडळाचे सदस्य, पदाधिकारी,अधिकारी व कर्मचारी  आदी यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी पांझरीलोधी येथील शेतकरी प्रशांत मारोती ठाकूर यांच्या कापूस शेतीची पाहणी केली. शेतात आठ ते दहा दिवस पाणी साठल्याने तेथील पीक पुर्णत: करपून गेले आहे. तेथे पुर्नशेतीच करावी लागणार आहे. त्यासोबत वारंगाचे सरपंच राजेश भोयर यांच्या शेतात पाणी शिरल्याने त्यांचेही पीक नष्ट झाले आहे. तलाठी, कृषी सहायकांनी योग्य सर्व्हे व पंचनामे करावेत. प्रत्यक्ष तपासणी सोबतच त्या भागाची व्हिडिओग्राफी व फोटोग्राफीसह योथोचित प्रस्ताव सादर करावेत. जेणे करुन अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे, या कामात कुठलीही हयगय होता कामा नये, असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधितांना दिले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून नुकसानग्रस्त भागाची माहिती घेतली.