बंडखोरांपुढे शिवसेना हतबल! जाहीर केला द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा

मुंबई : बंडखोरांपुढे हतबल झालेल्या शिवसेनेने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत खासदारांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाआघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. यासंदर्भात मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या खासदारांनी व्यक्त केलेल्या इच्छेची दखल घेत शिवसेनेने मुर्मूंना पाठिंबा घेण्याचा निर्णय घेतल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

शिवसेनेतील ४० आमदारांपाठोपाठ आता शिवसेनेचे १८ पैकी १४ खासदारही एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याची दाट शक्यता आहे. तर पुढील आठवड्यात होणाऱ्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणुक होत आहे. शिवसेनेच्या खासदारांनी ठाकरे यांच्यावर मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी दबाव आणला होता. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत खासदारांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा देण्याची मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि राजेंद्र गावित यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला ७ खासदार गैरहजर होते. या बैठकीत मुर्मू या महिला आहेत व आदिवासी समाजाच्या आहेत. मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांची तुलना करता मुर्मू यांनाच पाठिंबा देणे उचित ठरेल, असे स्पष्ट मत खासदारांनी व्यक्त केले. यामुळे राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतल्याचे राऊत यांनी सांगितले.

महाराष्ट्रात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. आदिवासी क्षेत्रात काम करणारे अधिक शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. बैठकी दरम्यान प्रत्येकाची मतं समजून घेतली. द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला म्हणजे भाजपला पाठिंबा दिला असे नाही. यशवंत सिन्हा तेही विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत. त्यांनाही आमच्या सद् भावना आहेत. कारण देशामध्ये एकी पाहिजे. हे जरी खर असले तरी अनेकदा अशा निवडणुकासंदर्भात एक लोक भावना काय आहेत. ते पाहून हा निर्णय घ्यावा लागतो, असे राऊत यांनी सांगितले.

यापूर्वीसुद्धा एनडीएत असून देखील शिवसेनेने प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला होता. कारण प्रतिभा ताई पाटील पहिली महाराष्ट्राची मराठी महिला होत्या. त्यामुळे शिवसेनेला अशा प्रकारची निर्णय घेण्याची एक परंपरा असल्याचे राऊत यांनी सांगितले.