देशाला पाच ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न महाराष्ट्राशिवाय पूर्ण होणार नाही – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी

मुंबई ,८ जुलै /प्रतिनिधी :- महाराष्ट्र हे देशाचे विकास इंजिन आहे. देशाला पाच ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न मुंबई आणि महाराष्ट्राशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. महाराष्ट्राने कायमच देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे. सेवा, कृषी, आरोग्य अशा क्षेत्रात महाराष्ट्राने उत्कृष्ट काम केले असून महाराष्ट्रात येणाऱ्या काळात बांधण्यात येणारे रस्ते, रोप वे यामुळे अधिकच्या पायाभूत सुविधा निर्माण होण्यास मदत होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत आजादी का अमृत महोत्सवअंतर्गत संकल्प से सिध्दी (नवा भारत, नवे संकल्प) परिषद आज सकाळी हॉटेल द ताजमहल पॅलेस येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सांस्कृतिक कार्य आणि परराष्ट्र व्यवहार  राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्यासह सीआयआयचे पदाधिकारी यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.

सध्या निर्मिती अवस्थेत असलेला दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्ग, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग आणि अनेक नवे रस्ते प्रकल्प यांच्यामुळे महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला आणखी चालना मिळेल असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. सीआयआय अर्थात भारतीय उद्योग महासंघाने आज मुंबईत आयोजित केलेल्या दुसऱ्या ‘संकल्पातून सिद्धी – नवा भारत, नवे संकल्प परिषदे’च्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबई शहराला दिल्ली, पुणे आणि बंगळूरू या शहरांशी जोडणाऱ्या मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे असे त्यांनी सांगितले. 

सुमारे 1 लाख कोटी रुपये खर्चाच्या महत्त्वाकांक्षी दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाचे 70% काम पूर्ण झाले असून या महामार्गाच्या बांधणीनंतर भारताची राष्ट्रीय राजधानी आणि आर्थिक राजधानी यांच्यातील प्रवासाला 12 तास इतका कमी वेळ लागेल अशी माहिती केंद्रीय मंत्री गडकरी यांनी यावेळी दिली. ते म्हणाले, “सुमारे 50,000 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाचे काम हाती घेऊन वसई-विरारपर्यंत, तसेच त्याच्याही पुढे पोहोचणारे तटवर्ती रस्ते आणि सी-लिंक मार्ग यांचे जाळे निर्माण करून मुंबईतील नरीमन पॉइंटहून दिल्लीपर्यंत अखंडित प्रवास सुविधा निर्माण करणे हे माझे स्वप्न आहे.” या प्रकल्पाच्या कामासाठी लागणारे पोलाद आणि सिमेंट यांच्यावरील राज्य वस्तू आणि सेवा कर माफ करावा अशी विनंती गडकरी यांनी महाराष्ट्र सरकारला केली.  

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचा पश्चिमेकडील बायपास रस्ता आणि पुणे रिंग रोड यांच्या माध्यमातून मुंबई आणि बंगळूरू ही शहरे थेट रस्त्याने जोडण्याच्या योजनेची माहिती देखील केंद्रीय मंत्र्यांनी दिली. ते म्हणाले की, रस्ते संरेखन करण्याची योजना यापूर्वीच तयार झाली आहे आणि या रस्त्याचे काम लवकरच सुरु होईल अशी अपेक्षा आहे. पुणे आणि औरंगाबाद या शहरांदरम्यानचा प्रवासाचा कालावधी 2 तास इतका कमी करणाऱ्या नव्या रस्त्याच्या संरेखनाचे नियोजन करण्यात आले आहे अशी माहिती देखील गडकरी यांनी दिली.

भारताला 5 ट्रिलीयन अमेरिकी डॉलर्सची अर्थव्यवस्था करण्यात महाराष्ट्राचे योगदान

आर्थिक विकासात पायाभूत सुविधांना असलेल्या महत्त्वावर भर देत, केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, भारताचे 5 ट्रिलीयन अमेरिकी डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्याचे स्वप्न महाराष्ट्राच्या भरीव योगदानाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. “महाराष्ट्र हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाचे इंजिन आहे आणि 5 ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्याचे देशाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी महाराष्ट्र राज्याला कृषी, उद्योग तसेच सेवा या क्षेत्रांमध्ये प्रमुख योगदान द्यावे लागेल,” ते म्हणाले.

भविष्यात अधिक प्राधान्यक्रमाचे इंधन म्हणून लोकांनी इथेनॉलचा वापर करावा

साखर उद्योगाने महाराष्ट्राच्या समृद्धीमध्ये योगदान दिले आहे, असे गडकरी यांनी सांगितले. अतिरिक्त साखर उत्पादनाच्या समस्येला तोंड देण्यासाठी आम्ही पेट्रोलइतकेच उष्मांकी मूल्य असलेल्या इथेनॉलला आता इंधन म्हणून प्रोत्साहन देत आहोत, असे ते म्हणाले. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या फरिदाबाद येथील संशोधन आणि विकास केंद्राने असे प्रमाणित केले आहे की पेट्रोलपासून जितके ऍव्हरेज मिळते तितकेच ऍव्हरेज इथेनॉलने मिळवणे शक्य आहे.

भविष्यात अधिक प्राधान्यक्रमाचे इंधन म्हणून लोकांनी इथेनॉलचा वापर करावा असे आवाहन केंद्रीय मंत्र्यांनी जनतेला केले. विशेषतः पुढल्या महिन्यापासून बाजारात फ्लेक्स इंजिन वाहने उपलब्ध होणार आहेत याचा विचार करून हा बदल स्वीकारावा, असे ते म्हणाले. सुमारे 115 रुपये प्रती लिटर दराने मिळणाऱ्या पेट्रोलपेक्षा 64 रुपये लिटर दराने मिळणाऱ्या इथेनॉलचा वापर करणे सामान्य जनतेसाठी अधिक किफायतशीर ठरेल असे गडकरी म्हणाले. 

इथेनॉल, मिथेनॉल, बायो डिझेल, बायो सीएनजी, बायो एलएनजी आणि हरित हायड्रोजन यांसारख्या पर्यायी इंधनांच्या वापराला प्रोत्साहन देऊन पेट्रोलचा वापर कमी करण्याच्या बाबतीत महाराष्ट्र देशातील अग्रणी राज्य बनू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबई आणि पुण्यामध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला दिल्या जात असलेल्या प्रोत्साहनाची देखील गडकरी यांनी प्रशंसा केली. शहरांतर्गत वाहतुकीसाठी खर्चात बचत करू शकणाऱ्या ट्रॉली बसचा वापर सुरु करण्याची शक्यता आजमावून पाहायला हवी अशी सूचना गडकरी यांनी केली.

आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी एकात्मिक विचारधारेची गरज आहे असे ते म्हणाले. रोजगार क्षमता वाढविण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक आवश्यक आहेच पण त्याचबरोबर दारिद्र्य निर्मूलनासाठी कृषी क्षेत्रात, ग्रामीण तसेच आदिवासी भागांमध्ये अधिक गुंतवणुकीची गरज आहे असे त्यांनी पुढे सांगितले. 

समृध्दी महामार्ग महाराष्ट्राच्या विकासाचा साक्षीदार ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

समृध्दी महामार्ग महाराष्ट्राच्या विकासाचा साक्षीदार ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र हे देशाचे विकास इंजिन कायमच राहिले आहे. महाराष्ट्रात वेगाने विकास होण्याची क्षमता असून उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनामार्फत संपूर्ण प्रोत्साहन दिले जाईल. वेगवेगळ्या क्षेत्रातील उद्योजकांनी महाराष्ट्रात येण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले जाईल. महाराष्ट्राच्या प्रगतीचा आणि विकासाचा साक्षीदार ठरणाऱ्या समृध्दी महामार्गाचा एक टप्पा लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आज आपण देशाचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना भारताच्या येणाऱ्या पुढच्या 25 वर्षात नेमकी काय प्रगती आणि विकास करायचा आहे याचे नियोजन करणे आवश्यक आहे. समतोल विकास साधत असताना पायाभूत सुविधांसह राज्यातील प्रत्येक क्षेत्रावर लक्ष देण्यात येणार आहे. महाराष्ट्र ही जशी संतांची  आणि देवांची भूमी म्हणून ओळखली जाते तसेच महाराष्ट्राची उद्योग आणि पायाभूत सुविधांमध्ये अग्रेसर असे राज्य अशीसुध्दा ओळख असून ही ओळख कायम टिकविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने गेल्या पाच वर्षात समृध्दी महामार्गाचे काम पूर्ण करण्याबरोबरच खालापूर ते सिंहगड येथे सर्वात मोठा बोगदा बांधण्याचे काम पूर्ण केले आहे. हा बोगदा बांधण्यात आल्याने आता मुंबईहून पुण्याला जाताना वेळेची बचत होण्यास मदत होणार आहे. आजच्या काळात राज्याची प्रगती ही पायाभूत सुविधांचे जाळे किती विकसित आहे यावरुन ठरत असते असे म्हटले जाते. त्यामुळे महाराष्ट्रात येणाऱ्या काळात रस्त्यांचे आणि पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारीकरणावर भर देण्यात येणार आहे.

आपण मुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच एका जाहीर कार्यक्रमात उद्योजकांना भेटत असून येणाऱ्या काळात कौशल्य विकास, कृषी या क्षेत्रास महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी या उद्योजकांनी पुढे यावे असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले. पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने पेट्रोलला पर्याय म्हणून इथेनॉलचा वापर करण्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घेतला आहे.

मेट्रो आणि बुलेट ट्रेनसारखे प्रकल्प मुंबईला देशाशी जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “देशात बुलेट ट्रेन सुरु करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. काही कारणांमुळे, महाराष्ट्र राज्य या बाबतीत मागे राहिले तर गुजरात राज्याने बुलेट ट्रेन सुरु करण्यासाठी तातडीने काम सुरु केले. पण, आता आम्ही देखील हे काम मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे कारण ही फक्त बुलेट ट्रेनचीच सुरुवात  नाही तर वाहतुकीच्या एका नव्या टप्प्याची सुरुवात आहे.”

महाराष्ट्रामध्ये विविध प्रकल्प आणि योजना राबवित असताना आणि एकात्मिक प्रगती साध्य करीत असताना शेवटच्या घटकापर्यंत ही मदत पोहोचणे यावर भर देण्यात येणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय प्रकल्पाचे काम असेल किंवा महाराष्ट्रात आणि मुंबईत मेट्रो सेवा सुरु करणे, बुलेट ट्रेनसारखे प्रकल्प सुरु केले तर मुंबई हा देशाशी जोडला जाण्यास महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. महाराष्ट्राच्या प्रगतीचा साक्षीदार ठरणाऱ्या समृध्दी महामार्ग हा 700 किमी असून केवळ 9 महिन्यात राज्य शासनामार्फत जमिन अधिग्रहण करण्याचे काम सुरु करण्यात आले. येणाऱ्या काळात पेट्रोलला पर्याय म्हणून इथेनॉल निर्मिती आणि वापर यावर भर देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, केंद्र शासनाच्या केंद्रीय रस्ते  आणि महामार्ग वाहतूक मंत्रालयाने महाराष्ट्रात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यावर भर दिला. केंद्र शासनाबरोबरच राज्य शासनसुध्दा येणाऱ्या काळात नवी मुंबई विमानतळाचे काम वेगाने कसे पूर्ण होईल यासाठी काम करीत आहे. वेगवेगळया शहरांमध्ये मेट्रो रेल्वेचे जाळे तयार करण्याबरोबरच मुंबई मेट्रोचे कामेही प्राधान्याने पूर्ण करण्यावर भर असेल. मुंबई ही केवळ महाराष्ट्राची नाही तर देशाची आर्थिक राजधानी असून महाराष्ट्र हे भारताच्या अर्थव्यवस्थेचे पॉवरहाऊस आहे. पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान आणि नविनताभिमुख बाबी एकत्र करुन 2030 पूर्वी महाराष्ट्राला ट्रिलीअन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.

या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक विभागाच्या राज्यमंत्री मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात गेल्या 75 वर्षांत सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात उत्तम प्रगती केली आहे. त्या पुढे म्हणाल्या, “सर्वांचे हित साधण्यासाठी आर्थिक विकास हा नेहमीच पाया ठरतो. मात्र विचारसरणीत बदल करणे हे देखील तितकेच किंवा त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे.

सीआयआय आणि इंडिया@75 संस्था यांनी केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या सहकार्याने संयुक्तपणे संकल्पातून सिद्धी ही परिषद आयोजित केली आहे.