प्रसिद्ध विनोदी लेखक व कथाकथनकार द. मा. मिरासदार यांचे निधन

पुणे ,२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- मराठी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ साहित्यिक, प्रसिद्ध विनोदी लेखक व कथाकथनकार दत्ताराम मारुती मिरासदार यांचे आज वृध्दापकाळाने निधन झाले. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मराठी साहित्यातील अनेक नररत्न जसे की, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, चिं.वि. जोशी, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे यांनी जोपासलेली विनोदी लेखनाची परंपरा द. मा. मिरासदारांनी पुढे सुरू ठेवली. मिरासदारांच्या व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा उत्कृष्ट लिखाण आणि त्याचे उत्तम सादरीकरण यामुळे वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे २४ कथासंग्रह, १८ विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत. मराठी साहित्य क्षेत्रातील कादंबरी, विनोदी कथा, वगनाटय, चित्रपट संवाद, विविध विषयांवर लेख इत्यादी सर्व साहित्य प्रकार प्रा. मिरासदार यांनी लीलया हाताळले आहे. राज्य पुरस्कार, गदिमा पुरस्कार, अत्रे पुरस्कार, अश्या अनेक पुरस्कारांनी त्यांचा गुणगौरव करण्यात आलेला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांना श्रद्धांजली

एकापेक्षा एक साहित्य आणि त्यांनी लिहिलेलं लेखन आजही तितकंच जिवंत वाटणारं आहे.  साहित्य अकादमी, महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्कार यांसारखे पुरस्कार मिळवलेल्या ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. त्यांच्या जाण्यामुळे साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे.

ज्येष्ठ साहित्यिक द. मा, मिरासदार यांच्याकडे उत्तम कथाकथन कऱण्याची शैली होती. त्यांनी महाराष्ट्रात अनेक कार्यक्रमही केले आहेत. मराठीतले विनोदी लेखक आणि कथाकथनकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांच्या नावावर 24 कथासंग्रह आणि 18 विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत. 

काही वर्षे पत्रकारिता, नंतर अध्यापन क्षेत्रात प्रवेश

दत्ताराम मारुती मिरासदार उर्फ द. मा. मिरासदार यांनी काही वर्षे पत्रकारीता केल्यानंतर त्यांनी 1952 साली अध्यापनक्षेत्रात प्रवेश केला. पुण्याच्या कॅम्प एज्युकेशनच्या शाळेत ते शिक्षक होते. व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार या त्रयीने 1962 सालापासून कथाकथन करुन महाराष्ट्रातलील जनतेला भुरळ घातली होती. मिरासदारांच्या व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा उत्कृष्ट लिखाण आणि सादरीकरण यामुळे वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे 24 कथासंग्रह, 18 विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत. ‘एक डाव भुताचा’ या चित्रपटात कथा-पटकथा लेखनासह हेडमास्तरची भूमिकाही त्यांनी केली होती.

हुबेहूब, विरंगुळा, स्पर्श, मिरासदारी, भोकरवाडीच्या गोष्टी हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी लिहिलेल्या बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर आहेत. त्यांनी लिहिलेले कथासंग्रह पुन्हा पुन्हा वाचण्याचा मोह वाचकांना आवरत नाही. गप्पांगण हे ललित लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत. लाडाची मैना हे त्यांनी लिहिलेले वगनाट्य. जावईबुवाच्या गोष्टी आणि गाणारा मुलुख  ही पुस्तके त्यांनी लहान मुलांसाठी लिहिली.

द मा मिरासदार यांचा जन्म 14 एप्रिल 1927 रोजी झाला होता. त्यांचं मूळ गाव पंढरपूर होतं. काही वर्ष त्यांनी पत्रकारीतेत काम केलं. त्यांनंतर औरंगाबाद तसेच पुण्यात मराठीचे प्राध्यापक म्हणून काम करत होते. विनोदी कथालेखक म्हणून द. मा. मिरासदार प्रसिद्ध आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील ते होते. 

दोन चित्रपटांच्या संवाद लेखनाबद्दल त्यांना पारितोषिके

मिरासदारांच्या कथासंग्रहांतील बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर असत. ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातील विनोद मिरासदारांनी आपल्या कथांतून फुलवला. असे असले, तरी ‘स्पर्श’, ‘विरंगुळा’, ‘कोणे एके काळी’ सारख्या काही गंभीर कथांतून त्यांनी जीवनातील कारुण्यही प्रत्ययकारीपणे टिपले. तसेच अनेकदा त्यांच्या विनोदालाही कारुण्याची झालर असल्याचे दिसून येते. एक डाव भुताचा आणि ठकास महाठक या दोन चित्रपटांच्या संवाद लेखनाबद्दल त्यांना पारितोषिके मिळाली होती.

‘व्यंकूची शिकवणी’ या त्यांच्या गाजलेल्या विनोदी कथेवरुन गुरुकृपा हा मराठी चित्रपट काढण्यात आला होता. मराठी साहित्यिकांनी विनोदी वाङ्मयात ज्या अजरामर कथा लिहिल्या त्यात द. मा.मिरासदार यांची ‘माझ्या बापाची पेंड’ आणि ‘भुताचा जन्म’ यांचा समावेश व्हायला हरकत नाही. ‘मिरासदारी’ या पुस्तकातली ‘भुताचा जन्म’ ही कथा प्रसिद्ध आहे. ही लोकप्रिय कथा बारावीच्या अभ्यासक्रमातल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात घेतली आहे.

‘भुताचा जन्म’ शॉर्ट फिल्म आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये गाजली

द.मा.मिरासदार यांच्या ‘भुताचा जन्म’ या कथेवर बनलेली शॉर्ट फिल्म आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये गाजली. ही कलाकृती रोममध्ये होणाऱ्या फेस्टिवलमध्येही दाखवली गेली. द. मा. मिरासदार यांच्या खास विनोदी शैलीतल्या निवडक कथांचा अत्यंत सुरस संग्रह म्हणजे मिरासदारी हे पुस्तक.

मिरासदारांच्या लेखनात अस्सल विनोदी गावरान पात्रे

गेल्या काही वर्षांत मराठी ग्रामीण कथेच्या उदयाबरोबर ग्रामीण वातावरणाशी संलग्न असणारी हास्यजनक कथा जन्माला आली. तिच्यात वृत्तीची विविधता आहे, केवळ एकसुरीपणा नाही. मिरासदारांच्या या कथांतून एक अनोखी मिश्किलपणाची, चमत्कृतीपूर्ण वळणांची व गमतीदार विक्षिप्तपणाची झाक वाचकाला अतिशय भावली. मिरासदारांच्या लेखनात अस्सल विनोदी अशी अनेक गावरान पात्रे आढळतात. त्यात नाना चेंगट, गणा मास्तर, रामा खरात, बाबू पैलवान, सुताराची चहाटळ आनशी, ज्ञानू वाघमोडे, अशी एकाहून एक अस्सल इब्लीस, बेरकी, वाह्यात, टारगट आणि क्वचित भोळसट अशी ही सारी पात्रे आहेत. ती श्रोत्यांना खळाळून हसायला लावत.

मिरासदारांच्या कथासंग्रहांतील बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर आहेत. ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातील विनोद मिरासदारांनी आपल्या कथांतून फुलवला. त्याचप्रमाणे त्यांनी ‘स्पर्श’, ‘विरंगुळा’, ‘कोणे एके काळी’ सारख्या काही गंभीर कथांतून जीवनातील कारुण्यही प्रत्ययकारीपणे टिपले आहे. द. मा. मिरासदार हे नेहमीच त्यांच्या मार्मिक आणि शैलीदार विनोदांसाठी प्रसिद्ध राहिले आहेत.

महाराष्ट्रातील विविध गाव आणि तिथे राहणारी माणसं आपल्याला नेहमी मिरासदारांच्या कथेतून भेटत राहतात. ‘चकाट्या’मध्ये ही अशाच काही गावात आणि शहरात राहणाऱ्या अवली माणसाच्या आणि त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांच्या कथा आपल्याला वाचायला मिळतात. फक्त शाब्दिक विनोद न करता प्रासंगिक विनोद लेखनातून वठवणे आणि साध्या लिखाणातून वाचकाला गुंतवून ठेवणे यातच लेखकाचे यश मानता येईल. ‘शिवाजीचे हस्ताक्षर’ ही कथा तर अप्रतिम. द. मा. मिरासदार यांना विंदा करंदीकर जीवनगौरव, पुलोत्सव जीवनगौरव’ पुरस्कार मिळाला आहे. रवींद्र मंकणी हे द. मा. मिरासदार यांचे जावई होत.

‘द. मा. म्हणजे ग्रामीण विनोदाची मिरासदारी’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांना श्रद्धांजली

मुंबई :- मराठी साहित्यात ग्रामीण विनोदाच्या रंग-ढंगातून रंगत आणणारे आणि लेखन, कथाकथनातून अस्सल गावरान, मराठमोळा बाज सातासमुद्रापार नेणारे साहित्यिक म्हणून द. मा. मिरासदार यांची ‘मिरासदारी’ अबाधित राहील. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वाने निखळ आणि अलौकिक प्रतिभावान असा साहित्यिक गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, द. मा. म्हणजेच दादासाहेबांनी मराठी साहित्यात आपल्या नावाप्रमाणेच मिरासदारी निर्माण केली. मराठीत ग्रामीण जीवनातील पार, कट्ट्यावरचा आणि अशा अनेक इरसाल नमुन्यांचा विनोदी खजिन्याचा पेटाराच दादासाहेबांनी उघडला. विनोदी लेखन, कथाकथन यातून त्यांनी अवघ्या महाराष्ट्राला मनमुराद हसवले. कथाकथनातून त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राचा मराठमोळा बाज सातासमुद्रापार नेला. तसेच ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातही गेले. दादासाहेब उभे राहायचे, खर्जातील आवाजात कथा रंगवून सांगू लागले की त्या गावातले नमुने आरसा दाखवल्याप्रमाणे खळखळून हसू लागायचे. विलक्षण निरीक्षण शक्ती आणि लेखन-सादरीकरणातील निर्भेळपणा यामुळे द. मा. मिरासदार यांनी आपली अशी ‘मिरासदारी’ निर्माण केली. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्याने अलौकिक प्रतिभावान असा साहित्यिक गमावला आहे. ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांना श्रद्धांजली

ज्येष्ठ साहित्यिक, प्रसिद्ध कथाकथनकार द. मा. मिरासदार यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. अस्सल ग्रामीण ढंगाच्या कथाकथनाच्या माध्यमातून त्यांनी मराठी रसिकांना निखळ आनंद दिला, त्यांच्या निधनाने सिद्धहस्त लेखक, प्रतिभावंत साहित्यिक, कथाकथनकार हरपला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांनी त्यांच्या लेखनाची सुरुवात पत्रकारितेच्या माध्यमातून केली. पत्रकारिता क्षेत्रात काम केल्यानंतर त्यांनी प्रदीर्घकाळ अध्यापनाचे काम केले. विद्यार्थीप्रिय शिक्षक अशी त्यांची ख्याती होती. सामान्य वाचकांबरोबरच जाणकार समिक्षकांनीसुद्धा त्यांच्या लेखनाला दाद दिली. अस्सल ग्रामीण ढंगाच्या माध्यमातून द. मा. मिरासदार यांनी  कथाकथनाची आपली वेगळी शैली विकसित केली. मराठी कथाकथन प्रकाराला लोकप्रियता मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या निधनाने प्रतिभावान साहित्यिक, कथाकथनकार हरपला आहे, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.