कोविड काळातदेखील स्वच्छतेची जबाबदारी मेहनतीने पार पाडणाऱ्या सफाई मित्रांचे मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

मुंबई ,२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- कोविड काळातदेखील स्वच्छतेची जबाबदारी गांभीर्याने पार पाडणाऱ्या सफाई मित्रांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले आहे.

मुख्यमंत्री म्हणतात की, आज महात्मा गांधी यांची जयंती आहे. आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवदेखील साजरा करीत आहोत. हे औचित्य दाखवून आपण स्वच्छतेचे काम गांभीर्याने पार पाडणाऱ्या फ्रंट लाईनर्स सफाई मित्रांचा देखील सन्मान करीत आहोत ही त्यांचं मनोबल वाढवणारी गोष्ट आहे.

दोन वर्षापासून या कोरोनाच्या कठीण परिस्थितीतदेखील सफाई कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेचे काम अतिशय प्रामाणिकपणे आणि मेहनतीने तसेच जबाबदारीने पार पाडले हे प्रशंसनीय आहे. नगर विकास विभागाने त्यांचे कौतुक करायचे ठरवले ते उचित आहे. अशा कर्मचाऱ्यांमुळे स्वच्छतेला प्रोत्साहन मिळते आणि शहराचे तसेच नागरिकांचे आरोग्य ठीक राहण्यास मदत होते. या सफाई मित्रांचे कौतुक करावे तितके कमी आहे. कोविड विरुद्धच्या लढाईमध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे आहे, असेही मुख्यमंत्री म्हणतात.