राष्ट्रवादीच्या दबावामुळे क्रीडा विद्यापीठ पुण्याला स्थलांतरीत करण्याचा निर्णय मराठवाड्यावर अन्याय करणारा – खासदार इम्तियाज जलील

राष्ट्रवादी समोर शिवसेनाने टेकले गुडघे, फक्त नाव संभाजीनगर पाहिजे विकासात मात्र शुन्य – खासदार इम्तियाज जलील

औरंगाबाद ,२४जुलै /प्रतिनिधी :-पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज ट्विट करुन माहिती दिली की, आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुणे येथे होणार असुन त्यासाठी बैठकही घेण्यात आल्याचे छायाचित्र प्रसारीत केलेले आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ हे औरंगाबादमध्ये प्रस्तावित असुन त्याकरिता जागाही निश्चित करण्यात आली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाखाली राज्य शासनाने क्रीडा विद्यापीठ पुण्याला स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला असल्याचा गंभीर आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.               

औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार इम्तियाज जलील यांनी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ औरंगाबादलाच करण्यात यावे इतरत्र हलविण्यात येवु नये असा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उद्योगमंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी कोणत्याही परिस्थितीत क्रीडा विद्यापीठ औरंगाबाद येथेच होणार असुन त्यासाठी जागाही निश्चित झालेली असल्याचे आश्वासित केले होते. मग क्रीडा विद्यापीठ पुणे येथे स्थलांतरीत करुन मराठवाड्यावर नेहमी प्रमाणे अन्याय का करण्यात आल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.           

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ औरंगाबाद जवळ करोडी येथे मंजूर झाले होते, गंगापूर तालुक्यातील वाळूज येथे क्रीडा सुविधा उभारल्या जाणार होत्या. जे औरंगाबादला मंजुर केले होते ते पुण्याला चालले आहे. विद्यापीठ औरंगाबाद येथे व्हायला पाहिजे. चार वर्षे सर्व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करुन करोडी येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जागा निश्चित करण्यात आली होती. मराठवाड्याचे सर्व कार्यालये इतरत्र हलवले जात आहे. क्रीडा विद्यापीठाबाबत तसे होवु नये अशी खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारला विनंती केली. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ औरंगाबादला प्रस्तावित झाले होते जागाही उपलब्ध आहे मग इतरत्र हलविण्याचा प्रश्नच येत नाही, विद्यापीठ औरंगाबादलाच करावे अशी आग्रहाची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारला केली.
मागच्या भाजपा व शिवसेना युती सरकारने सुध्दा अन्यायच केलेला आहे         

वर्ष २०१४ साली महाराष्ट्रात भाजपा व शिवसेनाचे सरकार होते त्यावेळी सुध्दा औरंगाबादवर अन्याय करण्यात आला होता. औरंगाबादला मंजुर झालेले एआयआयएमएस इन्सटिट्युट तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी नागपुरला स्थलांतरीत केले होते. इंटरनॅशनल इन्सटिट्युट ऑफ प्लानिंनग अ‍ॅण्ड आर्कीटेक्चर हि मंजुर झाले होते, परंतु त्यावर सुध्दा आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही.
राष्ट्रवादी समोर शिवसेनेने टेकले गुडघे        

औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेचे ५ आमदार व २ मंत्री असताना सुध्दा औरंगाबादेत प्रस्तावित असलेले व जागा सुध्दा निश्चित झालेले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ शिवसेनेच्या नाकाखालुन पुण्याला पळविण्यात राष्ट्रवादीला यश आले.महाविकासआघाडी सरकार मध्ये शिवसेनेचे महत्व किती आहे ते संपुर्ण महाराष्ट्राच्या जनतेसमोर आता उघड झालेले आहे. औरंगाबादेत राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त दोनच आमदार असताना सुध्दा त्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित करुन दाखविले. पुणे शहर हे सुरवातीपासुनच राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असुन तेथे अगोदर पासुनच अद्यावत बालेवाडी स्टेडिअम आहे तसेच याव्यतिरिक्त क्रीडा क्षेत्रासाठी विविध प्रकारचे सोयीसुविधा उपलब्ध असतांना सुध्दा राष्ट्रवादीने राजकीय फायदा घेत पुणे येथे क्रीडा विद्यापीठ पळविले असल्याचे आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केले.  
विकासासाठी नव्हे तर फक्त राजकारणासाठी संभाजीनगर नाव पाहिजे       

मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखले जाणारे औरंगाबादेत विकासाचे कामे न करता फक्त संभाजीनगर हे नाव पुढे करुन मतदारांची दिशाभुल करण्याचे राजकारण शिवसेना वर्षानुवर्षापासुन करत आहेत. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री व औरंगाबादचे पालकमंत्री शिवसेनेचे असतांना देखील औरंगाबाद जिल्ह्यालाचा विकास होण्यासाठी प्रस्तावित असलेले सर्व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रकल्प व विकास कामे इतरत्र हलविले जात आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेचे २ मंत्री ५ आमदार व पालकमंत्री सुध्दा शिवसेनेचे असुन त्यांना फक्त राजकारणासाठी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करायचे मात्र विकासाच्या बाबतीत सर्वजण शुन्य आहे अशी खोचक टिका सुध्दा खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.