लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान हुतात्मा ,चीनच्या ४३ जवानांचा मृत्यू
नवी दिल्ली: लडाखच्या गलवान खोऱ्यात चीनसोबत झालेल्या चकमकीत भारताचे तीन नव्हे तर जवळपास २० जवान शहीद झाल्याची नवी माहिती समोर आली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शहीद जवानांचा आकडा आणखी वाढू शकतो. शहीद झालेल्या भारतीय जवानांमध्ये कर्नल दर्जाचा अधिकाऱ्याचाही समावेश आहे. तर चीनचे तब्बल ४३ जवान या झटापटीत मारले गेले आहेत. याशिवाय, चीनचे अनेक जवान गंभीर जखमी असल्याचे सांगितले जाते.
लडाखमधील सीमावादाच्या पार्श्वभूमीवर नुकतंच भारत आणि चीनमधील सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. मात्र आता पुन्हा दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये गोळीबार झाल्याने सीमेवरील चिंता वाढली आहे. जम्मू काश्मीरमध्ये लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये चकमक झाली.लडाखमध्ये गलवान खोऱ्यात (Galwan valley) दोन्ही प्रत्यक्ष ताबारेषेजवळ दोन्ही बाजूंचे सैनिक एकमेकांना भिडले. भारताचे जवान शहीद झाले होते. या जवानांची नावे आता समोर आली आहेत. यामध्ये तेलंगणाच्या कर्नल संतोष बाबू यांचा समावेश आहे. शहीद कर्नल संतोष बाबू हे १६व्या बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर होते. गेल्या दीड वर्षापासून ते भारत-चीन सीमारेषेवर तैनात होते.कर्नल संतोष बाबू यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
तर अन्य दोन जवानांपैकी एकजण तामिळनाडूचा होता. पलनी (वय ४०) असे या जवानाचे नाव होते. पलनी हे तामिळनाडूचे सुपूत्र होते.
लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री ही चकमक झाली. भारत-चीन सीमावादावर बोलणी सुरू असतानाच घडलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा सीमेवर तणाव निर्माण झाला आहे.या सगळ्या घडामोडीनंतर भारत-चीन सीमेवरील लष्करी हालचालींना वेग आला आहे. या झटापटीनंतर गलवान खोऱ्याच्या परिसरात चिनी हेलिकॉप्टर्सची ये-जा मोठ्याप्रमाणाव वाढली आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही सशस्र दलाचे सेनापती बिपिन रावत, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसोबत तातडीची बैठक घेतली. नेमकं काल रात्री काय घडलं? याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
भारतीय लष्कराकडून यासंबंधी अधिकृत माहिती देण्यात आली आहे.