नरेंद्र मोदींनी देशाला ‘चीनचा कचरा, चिंता आणि चिता’ हे तीन ‘चि’ दिले – नाना पटोले यांचा घणाघात 

युपीएमध्ये नवीन पक्ष आले तर स्वागतच; देशाला वाचवण्याचे काम काँग्रेसच करेल

मुंबई. दि. १० मे २०२१

भारताला एक समृद्ध राष्ट्र म्हणून उभे करण्यात काँग्रेस पक्षाचा मोठा वाटा राहिला आहे. जगात भारत ताठ मानेने उभा राहिला तो पंडित नेहरूंपासून काँग्रेसच्या सरकारांनी केलेल्या विकासकामामुळे. परंतु दुर्दैवाने मागील सात वर्षात देशाच्या लौकीकाला काळीमा फासण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे. कोरोनाच्या महामारीत तर मोदी सरकारने देशातील जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले असून त्यांनी जनतेला फक्त ‘चीनचा कचरा, चिंता व चिता’, हे तीन ‘चि’ दिले आहेत, असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

अ ९ निवासस्थानी माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, कोरोनाची परिस्थीती हाताळण्यात मोदी सरकारला सपशेल अपयश आले आहे, त्यांच्या अहंकारामुळे देशातील जनता होरपळून निघत आहे. सुप्रीम कोर्टाला यात हस्तक्षेप करावा लागला आणि त्यांनीच टास्क फोर्स नेमला. पंतप्रधान मोदी कोणाचेही ऐकत नाहीत. त्यांनी लसीकरणाचा सावळा गोंधळ करून ठेवला आहे. १३० कोटी जनतेसाठी सरकारने घरोघरी जाऊन मोफत लसीकरण करायला हवे होते पण त्यांनी ते केले नाही. भारतातील लोकसंख्या विचारात घेता ३०० कोटी लसींची आवश्यकता आहे. ती लवकर पुर्ण होणे अवघड आहे. घाईगडबडीत मोदी सरकारने चीनशी काही गुप्त करार केला आहे की काय? अशी शंका उपस्थित होत असून अशा गुप्त करारातून चीनचा कचरा लस म्हणून भारतीय जनतेवर लादतील की काय अशी भीती निर्माण झाली आहे. मोदी सरकारच्या कारभारामुळे लोक भयभीत होऊन जगत आहेत. लोकांची चिंता वाढली असून कोरोनामुळे देशभर चिता जळतानाची विदारक दृश्ये दिसत आहेत.

देशात अन्नधान्याची टंचाई असताना काँग्रेस सरकारांनी हरितक्रांती, श्वेतक्रांती करून देशाला स्वयंपूर्ण बनवले. २००८ च्या जागतिक मंदीचे चटके जग सहन करत असताना देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि लोकांना याची झळ बसू दिली नाही. ज्यांनी अच्छे दिन, विश्वगुरु, महासत्ता बनविण्याचे स्वप्न दाखवले त्यांनी अवघ्या सात वर्षात भूतान आणि रवांडा यासारख्या देशांसमोर मदतीसाठी हात पसरवण्याची वेळ आणली व भारत मातेला छिन्न विछिन्न करण्याचे काम केले. देशाच्या एकता आणि अखंडतेला धोका पोहोचवला आहे. देशाला या संकटातून बाहेर काढून पुन्हा उभे करण्याची क्षमता फक्त काँग्रेसमध्येच आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी काँग्रेस देशाचा आत्मा आहे असे म्हटले आहे त्यांच्याशी आम्ही सहमत आहोत असे नाना पटोले म्हणाले.