ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील गुणी कलाकार हरपला – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख
मुंबई, दि. २५ : आपल्या अभिनय कौशल्याचा अमिट ठसा रसिक प्रेक्षकांच्या मनावर ज्येष्ठ अभिनेते, निर्माते राजीव कपूर यांनी उमटविला आहे. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीतील गुणी कलाकार हरपला आहे, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी राजीव कपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
श्री.देशमुख शोकसंदेशात म्हणतात, राजीव कपूर यांना ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक राज कपूर यांचा कलेचा वारसा लाभल्यामुळे त्यांचा अभिनयही रसिक प्रेक्षकांची मने जिंकणारा होता. त्यांचे चित्रपट निवडक जरी असले तरी त्यामधील त्यांच्या भूमिका आजही लोकप्रिय आहेत. ते विशेषतः ‘राम तेरी गंगा मैली’ (१९८५) आणि ‘एक जान हैं हम’ (१९८३) मधील अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत. ऋषी कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘प्रेमग्रंथ’ सिनेमाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली असून आपण त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी असल्याचे श्री.देशमुख यांनी सांगितले.