‘सरकार लवकरच लव्ह जिहाद कायदा आणणार’

मुंबई: भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सरकार लवकरच लव्ह जिहाद कायदा आणणार असल्याचे सुतोवाच केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार लवकरच लव्ह जिहाद कायदा आणेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लव्ह जिहाद, धर्मांतर आणि लँड जिहाद विरोधात कायदा करावा या मागणीसाठी आज सकाळी मुंबईत ‘सकल हिंदू समाजा’च्या वतीने ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला होता. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानातून निघालेला मोर्चा प्रभादेवी कामगार मैदानावर संपला. या मोर्चात हिंदू संघटनांचे नेते तसेच भाजप आणि शिंदे गटाचे नेते सहभागी झाले होते.

ते पुढे म्हणाले, मुंबईतील हिंदूंचा हा मोर्चा तुम्ही पाहिला आहे. हिंदूंची संख्या वाढल्याने शक्तीही अधिक आहे. त्यामुळेच आता हे बांगलादेशी, रोहिंग्या, जिहादी विचारसरणीचे लोक मुंबईत येऊन मुंबईतील हिंदूंची संख्या कमी करत आहेत. लँड जिहाद आणि लव्ह जिहाद करण्याचा कट रचणाऱ्यांना मुंबईतील आमच्या माता-भगिनी चोख उत्तर देऊ शकतात, हे दाखवून देण्यासाठी आजचा मोर्चा आहे.

हे हिंदूंचे भगवे वादळ

हे हिंदूंचे भगवे वादळ असल्याचा एल्गारही यावेळी आमदार नितेश राणे यांनी केला आहे. ते म्हणाले, हे भगवे वादळ आता थांबणार नाही. जिहादी पोसण्याचा कितीही प्रयत्न केला तरी मुंबईचा डीएनए भगवा आहे. आमचे रक्त भगवे आहे हे मुंबईकरांनी हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.