लोह्यात ६५ दिवसा पासून लॉक डाऊन;व्यापारी आर्थिक संकटात
लोहा ,२३मे /प्रतिनिधी :-
कोरोनाच्या काळात “ब्रेक द चैन ” साठी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी अकरा वाजेपर्यंत उघडण्यास मुभा आहे तर उर्वरित दुकानांना मनाई त्यामुळे कोरोना काळात दुकानदार सततच्या लॉक डाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे.लोह्यात १८ मार्च पासूनच टाळे बंदी सुरू आहे गेल्या ६५ दिवसा पासून या शहरातील व्यापारी लॉक डाउनला तोंड देत आहेत त्यामुळे त्रस्त झालेले व्यापारी “दांडा”खात आहेत आणि “दंड ” ही भरत आहेत.
लोहा ही मोठी बाजार पेठ।शिवाय मोंढ्यात आजूबाजूच्या गावातून विशेषतः गंगथंडी भागातून मोठ्या प्रमाणात शेती मालाची आवक येत असते .आता हळद , भुईमूग, ज्वारी, गहू याची जास्त आवक असते .शिवाय बाजारपेठेत दैनंदिन व्यवहारात मोठी उलाढाल असते शिवाय दुकानाला किराया तसा जास्तीचा असतो. दरवर्षी दुकाने वाढत आहेत कापड मार्केट जोरात असते तर यंदा दिवाळी पासून आता पर्यंत कंधार -पालम रोडवर कापसाची प्रचंड प्रमाणात खरेदी -विक्री झाली आहे .तालुक्यासह अन्य भागातून कापूस मोठ्या प्रमाणात वाहनातून लोह्याच्या बाजारात विक्रीसाठी आला .
मागील चौदा महिन्यापासून कोरोना काळात व्यापारी त्रस्त झाले आहेत .दसरा – दिवाळी काळात व्यापार बरा झाला पुढे लग्न सराई जोरात होईल या आशेवर बसलेले व्यापाऱ्यांचा भ्रम निराश झाला.शहरातील दुकानाला भाडे अधिकचे आहे शिवाय नौकर , लाईटबील, दुकान भाडे हे न चुकणारे आहे .दुकान सुरू असो की बंद ते भरावेच लागणार त्यामुळे कोरोना काळात “ब्रेक द चैन ” मोहिमेत पोलीस व पालिका प्रशासन दांडा मारून आणि दंड आकारून व्यापाऱ्यांना सांगत आहेत तरी सुद्धा झालेला आणि होत असलेला तोटा त्यातच आर्थिक डबघाईला आलेला व्यापार पाहता व्यापारी दुकाने खुली ठेवत आहेत .
व्यापाऱ्यांचा नाईलाज आहे .काय करावे? कोरोनामुळे सरकारने लॉक डाऊन जाहीर केले पण इतरांना जसे पॅकेज दिले तसेच शून्य टक्के व्याज दराने व्यापाऱ्यांनाही कर्ज द्यायला पाहिजे शिवाय मदत करायला हवी होती किमान वीज बिल माफ करायचे असते असे अनेक प्रश्न व समस्या व्यापारी मांडीत आहेत .कृउबा समितीचे व्यापारी संचालक माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम , व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नामदेव कटकमवार ,आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष दिनेश तेललवार, लक्ष्मीकांत बिडवई, माजी संचालक शंकर सावकार उतरवार, बाळू सावकार पालिमकर, हॉटेल व्यावसायिक बालाजी कळसकर, वाहेद शेख, मुन्ना होनराव, युनूस शेख, यानी व्यापाऱ्यांची व्यथा मांडली.
———————————————————————————-
दुकानांना वेळ वाढवून द्यावा
जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या घटते आहे.अनेक तालुक्यात ते दररोज रुग्ण सापडत नाहीत लोह्यात रुग्णाची संख्या ओसरली आहे एकंदरीत कोरोनाची घटती संख्या पाहता दुकानदारांना दुपारी 3 वाजेपर्यंत वेळ वाढवून द्यावी अशी मागणी व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे .
————————————————————————————–
लोह्यात १८मार्च पासून लॉक डाऊन सुरू आहे. सुरुवातीला पाच दिवस शहरातील सर्व व्यापारी , नगरपालिका यांच्या पुढाकाराने जनता कर्फ्यु पाळला गेला त्यानंतर २५ मार्च पासून दहा दिवस जिल्हाधिकारी यांनी रुग्ण संख्या वाढते म्हणून लॉक डाऊन संचार बंदी केली पुढे तर राज्य सरकारने निर्बंध लादले .गेल्या ६४ दिवसा पासून व्यापारी या लॉक डाऊन मध्ये आहेत .कोरोनामुळे एकीकडे अनेकांचे जीव गेले मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला तर दुसरीकडे छोटे मोठे व्यापारी लॉक डाऊन मध्ये आर्थिक डबघाईला आहे आहेत त्याचाही विचार आता रुग्ण संख्या घटत असताना व्हायला पाहिजे.