५० खोके कमी पडतायेत म्हणून बोके मुंबई आणि धारावी गिळायला निघाले- उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

धारावी ,मुंबई :-“५० खोके कमी पडायला लागले म्हणून मुंबई आणि धारावी गिळायला बोके निघाले आहेत,” अशा शब्दांत शिवसेनेचे (उ.बा.ठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अदानी आणि राज्यातील सत्ताधारी भाजपा आणि शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. ते धारावीचा पुनर्विकास करण्याचा प्रकल्प अदानी समुहाकडे दिल्याच्या विरोधात काढलेल्या महामोर्चाला संबोधित करीत होते. पुनर्विकास प्रकल्पात १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या टीडीआर अनियमिततेचा समावेश आहे, जो “जगातील सर्वात मोठा घोटाळा” आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

राज्यातील सरकार अदानींच्या दारी आहे. धारावीतील सर्व गोष्टींचा टीडीआर अदानींना देऊन टाकला आहे. यांना जर वाटत असेल, की ‘सब भूमी गोपाल की’, तशी ‘सब भूमी अदानी की’, तर असे अजिबात होऊ देणार नाही. आता तुमच्या लक्षात आले असेल की, अडीच वर्षे यशस्वीपणे चालणारे सरकार, गद्दारी करून यांनी पाडले, ते खोके कुणी पुरवले असतील? आता तुम्हाला लक्षात आले असेल, खोके कुणाकडून गेले असतील? विमान कुणी पुरवले असेल? हॉटेल बुकिंग कुणी केले असतील? मुळात सरकार पाडण्याचे कारण आता तुम्हाला कळले असेल. उद्धव ठाकरे सत्तेवर आहेत तोपर्यंत मुंबई गिळता येणार हे लक्षात आल्यानं सरकार पाडलं की काय असं वाटू लागलंय. ज्यांनी ज्यांनी अदानींची सुपारी घेतली आहे त्यांनी आजच्या मोर्चातील हा अडकित्ता, खलबत्ता लक्षात घ्यावा. या खलबत्त्यात यांना असं चेचून काढू की, पुन्हा अदानींचं नाव काढणार नाही, असे ठाकरे म्हणाले.

हे देवेंद्र फडणवीसांचे पाप

आम्ही अडीच वर्षे सत्तेत होतो, पण धारावीचा गळा घोटू असा एकही निर्णय घेतला नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. २०१८ मध्ये  धारावीच्या पुनर्विकासाचा निर्णय घेतला होता, त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यामुळे हे पाप देवेंद्र फडणवीसांचे आहे, असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला.

“घराला घर दिल्याशिवाय धारावीकरांच्या केसालाही धक्का लावू देणार नाही. जिथल्या तिथं घर हवं. पात्र अपात्र आम्ही मानत नाही. व्यवसायासाठी जागा द्या, कोळीवाडा-कुंभारवाड्यांचं सीमांकन द्या. लोणची पापड सारख्या व्यवसायाला खुल्या जागा द्या, अशी मागणी करतानाच या सरकारमध्ये निवडणूक घेण्याची धमक नाही असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. १९६० मध्ये  संयुक्त महाराष्ट्राच्या माध्यमातून मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिले, त्यावेळी १०५ मराठी माणसांनी रक्त सांडलं. ही आम्ही कमावलेली मुंबई आहे, त्याला हात लावाल तर याद राखा असा इशाराही त्यांनी दिला.

धारावी पुनर्विकास: अदानींच्या मुख्यालयावर धडक मोर्चा, लाखो लोक रस्त्यावर

image.png

देशाच्या आर्थिक राजधानीत मध्यवर्ती भागात असलेली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणजे धारावी. गेल्या अनेक वर्षांपासून धारावीचा पुनर्विकास रखडला आहे. नुकतेच धारावीचा पूनर्विकास करण्याचा प्रकल्प अदानी समूहाकडे गेल्याने या प्रकल्पाच्या विरोधाची ‘मशाल’ पेटली आहे.

अदानी समूहाला प्रकल्प देण्याच्या विरोधात शिवसेनेने ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढला असून अदानींचे मुख्यालय असलेल्या बीकेसीतील कार्यालयावर हा मोर्चा निघाला आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर धारावीत मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उद्धव ठाकरे या मोर्चात सहभागी झाले आहेत. यावेळी हजारो शिवसैनिकांसह धारावीतील लाखो नागरिक देखील यात सहभागी झाले आहेत.

काय आहेत मागण्या?

  • धारावीचा पुर्नविकास अदानी समूहाऐवजी सरकारने करावा, ही प्रमुख मागणी
  • धारावीच्या टीडीआरसाठी सकरारने स्वत:ची कंपनी नेमावी
  • धारावीमधील सर्व निवासी आणि अनिवासी झोपडीधारकांना पात्र ठरवून धारावीतच त्यांचं पुनर्वसन करावं
  • निवासी झोपडीधारकांनां ५०० चौरस फुटांपर्यंतचं घर मोफत द्यावं.
  • महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाच्या धारावीत असलेल्या चाळी आणि बिल्डिंगमधील रहिवाशांना ७५० चौफुटांचं घर मोफत देण्यात यावं.
  • धारावीतील झोपडपट्ट्यांमधून अनेक छोटेमोठे व्यवसाय चालतात. त्यांचं पुनर्वसन करण्यात यावं.
  • पुनर्विकास प्रकल्पासाठी नव्याने सर्वेक्षण करून, निवासी, अनिवासी रहिवासी जाहीर केल्यानंतरच प्रकल्पाला सुरुवात करावी
  • प्रकल्पाचं स्वरूप समजावं यासाठी मास्टर प्लान आधीच जाहीर करून सविस्तर माहिती देण्यात यावी

देशातील सर्वात मोठा टीडीआर घोटाळा

यापूर्वी, गुजरातमध्ये गेल्या काही काळात सातत्याने ड्रग्जच्या खेपा येत आहेत आणि ते नंतर महाराष्ट्रात येतंय. त्यामुळे अख्खी धारावी अशा लोकांच्या हातात देत असाल तर संपूर्ण मुंबईत ड्रग्जचा व्यापार सुरू होण्याची भीती आहे. धारावीच्या पोरांना ड्रग्जच्या पुड्या विक्री करताना पहायचे आहे का? हा धारावीतील जनतेच्या तोंडाला पाने पुसून आवळा देवून कोहळा काढण्याचा प्रयत्न आहे. हा मुंबई विकण्याचा प्रयत्न आहे. देशातील सर्वांत मोठा टीडीआर घोटाळा कुठे होत असेल तर तो धारावीत पुनर्विकास प्रकल्पात होत आहे, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. दुसरीकडे, ठाकरे गटाचा आजचा मोर्चा टीडीआर लॉबीच्या भल्यासाठी सुपारी घेऊन काढण्यात येणार असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.