बीड हिंसाचार आरोपींच्या अंगलट ; आरोपींकडून केली जाणार ११ कोटींची वसूली

बीडच्या माजलगाव शहरात झालेल्या हिंसाचारात अकरा कोटी रुपयांचं नुकसान 

बीड ,४ नोव्हेंबर /प्रतिनिधी :- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून राज्यभर सुरु असलेल्या आंदोलनाला बीड जिल्ह्यात ३० सप्टेंबर रोजी हिंसक वळण लागलं. या आंदोलना संतप्त जमावाने आमदार प्रकाश सोळुंके आणि संदीप क्षीरसागर यांचं घर पेटवून दिलं. याच बरोबर माजलगाव नगरपरिषदेच्या इमरातीला देखील आग लावण्यात आली. आंदोलनाला लागलेले हिंसक वळण आता या प्रकरणातील आरोपींना महागात पडणार आहे. सुमारे ११ कोटी रुपयांची वसुली या आरोपींकडून करण्यात येणार आहे.

बीडच्या माजलगाव शहरात झालेल्या हिंसाचारात अकरा कोटी रुपयांचं नुकसान झालं. या सर्व नुकसानीची वसुली या प्रकरणातील अरोपींकडून केली जाणार असून तसा अहवाल तयार होत आहे. आरोपींनी ही भरपाई न दिल्यास त्यांच्या वैयक्तिक मालमत्ता जप्त करुन वसुली होईल, अशी माहिती बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे. आतापर्यंत बीडमध्ये हिंसाचार आणि जाळपोळ करणाऱ्या १४४ आरोपींना अटक करण्यात आली असून दोन हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर, पोलिसांकडून अन्य आरोपींचा शोध घेण्याचं काम सुरु आहे.

मराठा आंदोलना हिंसक वळण लागल्यानंतर बीडमध्ये अनेक ठिकाणी शासकीय कार्यलयं, राजकीय पक्षांची कार्यालयं आंदोलकांच्या निशाण्यावर आली. त्यामुळे या हिंसाचारात जाळपोळ हा पूर्वनियोजित कट असल्याची शक्यता आहे. कारण या घटनेत जाळपोळ करणारे हे बीड परिसरासोबत तालुक्याच्या बाहेरचे असल्याची माहिती समोर आली आहे. या हिंसाचारादरम्यान बीड शहरातील बस स्थानकावर उभ्या असलेल्या अनेक बसेसची तोडफोड करण्यात आली होती. त्यामुळे, बीडमध्ये जमावाने फोडलेल्या ६१ बसेसच्या काचा बसवण्याचं काम सुरु आहे. यासाठी बीस लाखांच्या काचा हिमाचल प्रदेशमधून मागवण्यात आल्या आहेत.