..तर आम्ही टोलनाके जाळून टाकू; राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा

मनसैनिकांनी पहिला टोलनाका पेटवला ; राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे आक्रमक

टोल हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा स्कॅम

मुंबई,९ ऑक्टोबर  /प्रतिनिधी :- प्रवाशांच्या दुचाकी, तीन चाकी व चार चाकी वाहनांना राज्यात टोल (Toll) नाही. केवळ व्यवसायिक वाहनांकडून टोल वसुल केला जात आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल रविवारी म्हणाले होते. त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत या वाहनांकडून टोल घेतल्यास आम्ही टोलनाके जाळून टाकू, असा इशारा राज्य सरकारला दिला आहे.

राज ठाकरे यांनी शिवतीर्थ येथे पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. आज पत्रकार परिषदेत बोलताना ते पुढे म्हणाले की, फडणवीस तसे म्हणत असतील तर आम्ही टोलनाक्यांवर आमचे माणसे उभे करू व प्रवाशांच्या वाहनांना टोल आकारु देणार नाही. मात्र, आम्हाला कुणी विरोध केला तर तो टोलनाकाच जाळून टाकू, असा इशाराच राज ठाकरेंनी दिला आहे.

यावेळी टोलवसुली हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्कॅम आहे, असा दावा राज ठाकरे यांनी केला. राज्यातील टोलवसुलीवर अनेक राजकारण्यांचे उदरनिर्वाह होत आहे. त्यामुळे प्रत्येक टोलनाक्यावरुन किती टोलवसुली होत आहे? कधीपर्यंत टोलवसुली केली जाणार आहे? याचा हिशेब झालाच पाहीजे, असे राज ठाकरे म्हणाले.

तसेच त्याच-त्याच लोकांना कंत्राट मिळते कसे? असे प्रश्न राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना विचारले आहेत. तसेच यावेळी पत्रकार परिषदेतच राज ठाकरे यांनी राज्यातील सत्ताधारी आणि विरोधातील नेत्यांचे टोल संबंधीत जुने सात व्हिडिओ दाखवले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्धव ठाकरे यांच्या जुन्या क्लीप त्यांनी दाखवल्या.

व्हिडीओ क्लिप दाखवल्यानंतर राज ठाकरे म्हणाले की, ही माणसं प्रत्येकवेळी टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा करतात, या सगळ्यांची सरकारे महाराष्ट्रात येऊ गेली पण एकही गोष्ट झाली नाही. राजकारणातील अनेक लोकांचं उदरनिर्वाहाचं साधण आहे, असा आरोपही राज ठाकरे यांनी केला.

मनसैनिकांनी पहिला टोलनाका पेटवला ; राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे आक्रमक

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी टोलबाबतच्या इशाऱ्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले आहेत. मनसैनिकांनी पहिला टोलनाका पेटवून दिला आहे. मुलुंड येथील टोलनाका मनसैनिकांकडून पेटवण्यात आला आहे. याटोलनाक्याच्या केबिनमध्ये पेट्रोल टाकून हा टोलनाका पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन टोलबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. देवेंद्र फडणवीसांना सांगितल्याप्रमाणे जर लहान वाहनांना टोल लावू दिला जाणार नसले तर आमची माणसे टोलनाक्यावर उभ राहतील. जर याला विरोध केला तर आम्ही टोलनाका जाळून टाकू, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर मनसैनिकांनी पहिला टोलनाका पेटवून दिला आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, आम्ही जी टोलमुक्तीची घोषणा केली होती, त्यानुसार राज्यातील सर्व टोलवर छोट्या गाड्यांना आम्ही टोलमुक्ती दिली आहे. केवळ व्यावसायिक वाहनांकडूनच आम्ही टोल घेतो. त्याचे पैसे राज्य सरकारने दिलेले आहेत. फडणवीस यांचे वक्तव्य डोळ्यासमोर ठेवून मनसेने टोलनाक्यावर लहान वाहनांना विना टोल सोडण्याची घोषणा केली.