बारावीचा गणिताचा पेपर फुटला? इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही – राज्य शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण

मुंबई,३ मार्च  /प्रतिनिधी :- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेअंतर्गत दि.०३ मार्च २०२३ रोजीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली असल्याची बातमी वृत्त वाहिन्यावरून प्रसिध्द झाली आहे. तथापि, या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही, यामुळे इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे. याचे पडसाद विधीमंडळातही उमटले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेतही याप्रकरणी नाराजी व्यक्त केली. बोर्डाकडून कॉपीमुक्त अभियान राबवले जात आहे, मात्र दुस-यांदा पेपर फुटल्यामुळे राज्यभर याची चर्चा होत आहे.

या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे ही सकाळी १०.३० नंतर प्रसिद्ध झाली आहेत. मंडळ सूचनेनुसार सकाळ सत्रात १०.३० वाजेपर्यंत व दुपार सत्रात दु. २.३० वाजेपर्यंत परीक्षा दालनात परीक्षार्थींनी उपस्थित राहणे बंधनकारक केलेले आहे. त्या वेळेनंतर कोणत्याही विद्यार्थ्यास परीक्षा दालनात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे गणित विषयाचा पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही. असे मंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

संबंधित घटनेबाबत सिंदखेड राजा पोलिस ठाण्यात फिर्याद क्र. ००३७ अन्वये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करीत आहेत. त्यामुळे गणित या विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही. याची विद्यार्थी, शिक्षक, पालक व सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी, असे श्रीमती ओक यांनी स्पष्ट केले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे आज गणिताचा पेपर फुटला याची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती अमरावती बोर्डाचे सचिव उल्हास नरड यांनी दिली. विद्यार्थी ११ वाजताच वर्गात बसलेले होते, त्यामुळे याची चौकशी झाल्याशिवाय अधिक बोलता येणार नाही. पण जे कोणी यात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस योग्य ते कारवाई करतील, असे उल्हास नरड यांनी सांगितले.