एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू होणार

शिंदे फडणवीस सरकारच्या निर्णयाने विद्यार्थ्यांना दिलासा

पुणे,३१ जानेवारी / प्रतिनिधी :-एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्यभरातील उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा प्रश्न मंत्रिमंडळ बैठकीत मांडला. त्यानंतर अन्य मंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अवगत केले आणि हे नियम २०२५ पासून लागू करण्याची विनंती केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तत्वतः मान्यता मिळाल्याची माहिती आहे.

यूपीएससीच्या धर्तीवर नवीन अभ्यासक्रम यावर्षी लागू न करता तो २०२५ पासून लागू करावा या मागणीसाठी पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी आज पुन्हा रस्त्यावर आले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अलका टॉकीज चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याआधी १३ जानेवारीला देखील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते.

आंदोलनाच्या ठिकाणी भाजपचे अभिमन्यू पवार आणि गोपीचंद पडळकर हे देखील उपस्थित होते. आमदार गोपीचंद पडळकर यांनी या आंदोलनादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बातचीत करत विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले. यावेळी फडणवीस यांनी हा विषय आज मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाईल आणि निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते.