राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारात महाराष्ट्राची कामगिरी अभिमानास्पद – पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात अग्रस्थानी ठेवण्यासाठी प्रयत्नशील – पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि. 27 : राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारात महाराष्ट्राने मारलेली बाजी अतिशय अभिमानाची आहे. महाराष्ट्रात पर्यटनासाठी अनेक ठिकाणे आहेत. जुन्या पर्यटन स्थळाबरोबरच नवीन स्थळांचा ही विकास केला जाणार आहे, अशी प्रतिक्रिया पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केली.

त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राला मिळालेले यश अतिशय कौतुकास्पद आहे. या पुरस्काराने राज्यातील पर्यटनाच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्वांना प्रेरणा मिळणार आहे. पर्यटनाच्या क्षेत्रातील सर्व घटकांना एकत्र घेऊन राज्याचा पर्यटन विकासासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न केले जातील.

पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, शाश्वत आणि पर्यावरण पूरक पर्यटनास चालना देण्यासाठी विशेष कृती आराखडा आखण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

पर्यटनविषयक प्रसिद्धी मोहिमांचे उद्घाटन आणि महाराष्ट्र पर्यटन गीताचे लोकार्पण

महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात अग्रस्थानी ठेवण्यासाठी प्रयत्नशील – पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा

पर्यटनवाढीसाठी इंडियन ऑयल, हाफकीन इन्स्टिट्यूट आणि मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय यांच्याशी सामंजस्य करार

मुंबई,२७ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- राज्याला गडकिल्ले, समुद्रकिनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तू यांचा समृद्ध वारसा लाभला आहे. त्यामुळे आंतरराज्य तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी महाराष्ट्र नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात अग्रस्थानी ठेवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करुया, असे आवाहन पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित कार्यक्रमात  पर्यटनमंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी पर्यटन विषयक प्रसिद्धी मोहीम, पर्यटनाबाबत सामंजस्य करार, पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार, गायक शंकर महादेवन व अमृता फडणवीस यांनी गायलेल्या महाराष्ट्र पर्यटन गीताचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमास अप्पर मुख्य सचिव डॉ. नितिन करीर, पर्यटन संचालनालयाचे संचालक मिलिंद बोरीकर यांच्यासह पर्यटन क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.

पर्यटन मंत्री श्री.लोढा म्हणाले, यंदा पर्यटनविषयक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबरोबरच पर्यटनाला नवे दिशा देणारे ठरावे, यासाठी ‘पर्यटन – नवा विचार, नवी दिशा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यही पर्यटन क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहे, हे अत्यंत स्वागतार्ह आहे. एक आंतरराष्ट्रीय पर्यटक नऊ जणांना रोजगार देतो. त्यामुळे पर्यटन वाढीसाठी शासन पर्यटन विभागाच्या पाठीशी आहे. पर्यटनविषयक काही नवकल्पना असल्यास त्या राबविण्यासाठी शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल.

परदेशातील महावाणिज्य दूत यांना गणेशोत्सव दर्शन घडविण्यात आल्याने या उपक्रमातून एक चांगला संदेश परदेशी नागरिकांपर्यंत जाण्यास मदत झाली. पर्यटन विभाग अधिक शाश्वत, लवचिक आणि समावेशक पर्यटन स्वीकारून राज्यातील पर्यटनाची परिभाषा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही पर्यटनमंत्री श्री. लोढा म्हणाले.

‘मुंबईतील 75 व्हिडिओ‘ लाँच

मुंबई व्हिडिओ मालिका प्रकल्पामध्ये लोकप्रिय आणि पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या स्थळांभोवतालचे चित्रण करण्यात आले आहेत. स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पर्यटक आकर्षित होतील अशा प्रेक्षणीय स्थळांचा यात समावेश आहे. मुंबईतील 200 पर्यटन स्थळांचा यात समावेश आहे. महाराष्ट्र पर्यटनाच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनेलवर याचे व्हिडीओ आठवड्याला पोस्ट केले जातील.

अनलिमिटेड महाराष्ट्र पॉडकास्टसह ‘कानोदेखी’ लाँच

पॉडकास्ट हे पर्यटनाला चालना देणारे सर्वात महत्त्वाचे माध्यम म्हणून ओळखले जाते. पर्यटनाचा कायापालट करण्याचा एक भाग म्हणून, ‘अनलिमिटेड महाराष्ट्रासह कानोदेखी’ ही मालिका रेडिओ सिटी 91.1 एफ.एम.वर आठवड्यातून एकदा या प्रमाणे 6 महिन्यांसाठी प्रसारित केली जाईल.

टी.व्ही. मोहिमेचा शुभारंभ

पर्यटन विभागाकडून महाराष्ट्र पर्यटनाच्या चांगल्या जाहिराती आणि प्रसिद्धीसाठी 4 दूरचित्रवाणी मोहिमा सुरु करण्यात आल्या आहेत.

हिस्टरी टीव्ही 18 या दूरचित्रवाणी वाहिनीद्वारे रोड ट्रिप विथ ‘आर एन एम’ या शीर्षकांतर्गत महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळांसह स्थानिक खाद्य संस्कृतीवर आधारित भागांची निर्मिती करून सीएनएन, न्यूज 18 व सीएनबीसी या दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मुंबई, अलिबाग, महाबळेश्वर, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर आणि नाशिक मधील  किल्ले, मंदिरे, कला आणि संगीत, वन्यजीव, महाराष्ट्रातील आश्चर्ये, सण आणि बांधकामांच्या थीमवर आधारित कार्यक्रम व महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ आणि संबंधित स्थळांचा प्रचार करण्यासाठी काही खास कार्यक्रम नॅशनल जिओग्राफिक चॅनल आणि फॉक्स लाईफ, रोड ट्रिप विथ आरएनएम हे हिस्ट्री टीव्ही 18 एसडी आणि हिस्ट्री टीव्ही 18 एचडी वर प्रसारित केले जाईल.

360 व्हिडिओ, पॉडकास्ट आणि व्लॉग लाँच

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगवान आणि टेक्नोसॅव्ही जगाच्या बरोबरीने राहण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र पर्यटन विभाग महाराष्ट्रातील सर्व 6 युनेस्को हेरिटेज साइट्सचे 360 डिग्री व्हर्च्युअल रिअॅलिटी (VR) व्हिडिओ, पॉडकास्ट आणि व्लॉग तयार करत आहे. यामध्ये अजिंठा, वेरुळ, एलिफंटा लेणी, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको एन्सेम्बल शैलीतील मुंबई उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ (राजाबाई क्लॉक टॉवर, विद्यापीठ ग्रंथालय आणि दीक्षांत सभागृह), पश्चिम रेल्वेचे मुख्यालय, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, गेट – वे ऑफ इंडिया, बृहन्मुंबई महानगरपालिका इमारत, जीपीओ, तार इमारत, पश्चिम घाट (सह्याद्री रांगा), कास पठार, राधानगरी (दाजीपूर) वन्यजीव अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय उद्यान, सांगली, कोयना वन्यजीव अभयारण्य, सातारा या स्थळांचा समावेश आहे.

पर्यटनवाढीसाठी इंडियन ऑयल, हाफकीन इन्स्टिट्यूट, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय व वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (डब्ल्यू. सी. एल.) यांच्याशी सामंजस्य करार

महाराष्ट्र पर्यटन धोरण – 2016 अंतर्गत अद्वितीय पर्यटन प्रकल्पांना पाठिंबा देण्यासाठी, पर्यटन विभागाने इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड (आय.ओ.सी.एल.) सोबत मुंबईचे सर्वात प्रतिष्ठित स्मारक (ध्वनी  आणि प्रकाश शो) गेटवे ऑफ इंडिया उजळण्यासाठी सामंजस्य करार केला.

वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (डब्ल्यू.सी.एल.) सोबत महाराष्ट्रातील खाण आणि खनिजांचा खजिना उलगडण्यासाठी अनोखा व प्रायोगिक मार्ग उपलब्ध करून देणारी महाराष्ट्रात खाण पर्यटन संकल्पना सुरू करण्याबाबत एक सामंजस्य करार करण्यात आला.

हायकोर्ट हेरिटेज वॉक प्रमाणेच मुंबईतील वास्तूंचा समृद्ध वारसा, इतिहास आणि स्थापत्य कलेची जाणीव निर्माण करण्यासाठी पर्यटन विभागाने मुंबईतील हाफकीन इन्स्टिट्यूट आणि बॉम्बे व्हेटर्नरी कॉलेज येथे हेरिटेज वॉक सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला होता. या उद्देशाने आज त्यांच्यासोबत बिगर आर्थिक सामंजस्य करार करण्यात आले.

शहरातील 7 माहिती पुस्तकांचे उद्घाटन

देशी – परदेशी पर्यटकांना राज्यात आकर्षित करण्यासाठी पर्यटन विभागाने पर्यटन स्थळे म्हणून मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर आणि रत्नागिरी  या जिल्ह्यांची माहितीपत्रके तयार केली असून ही माहितीपत्रके संबंधित शहरातील निवडक उपहारगृहांमध्ये ठेवली जातील.

पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. करीर यांनी प्रास्ताविक, कल्पना साठे यांनी सूत्रसंचालन केले,  तर मिलिंद बोरीकर यांनी आभार मानले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.