राज्यात ‘माझा एक दिवस बळीराजासोबत’ अभियान राबवणार – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

मुंबई ,२५ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-शेतकऱ्यांच्या समस्या आणि अडीअडचणी जाणून घेण्यासाठी राज्यात ‘माझा एक दिवस बळीराजासोबत’ अभियान राबवून कृषी धोरण तयार करणार असल्याची घोषणा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत केली.

या अभियानात शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे यासाठी कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागाच्या सहकार्याने एकत्रितरित्या हे अभियान येत्या 1 सप्टेंबरपासून तीन महिन्याच्या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत शेतकऱ्यांसोबत लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी दिवसभर राहणार असून त्यांची दिनचर्या जाणून घेणार आहेत. या दरम्यान त्यांच्या अडीअडचणी जाणून आत्महत्यांच्या कारणांची मीमांसा देखील करणार आहेत. विशेषत: विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांचा अभ्यास करुन कृषी धोरण तयार करण्यात येणार आहे. या कृषी धोरणासाठी कृषी विद्यापीठ आणि  या क्षेत्रातील तज्ज्ञांचे अभिप्राय व सूचना घेण्यात येणार आहेत. राज्याचे कृषी धोरण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषिमंत्री श्री. सत्तार यांनी यावेळी दिली.