मुंबईहून ४१० यात्रेकरूंचा पहिला समूह हज यात्रेसाठी रवाना

पालकमंत्री अस्लम शेख यांनी विमानतळावर उपस्थित राहून यात्रेकरूंना दिल्या शुभेच्छा

मुंबई,१८ जून  /प्रतिनिधी :-  हज यात्रेसाठी ४१० यात्रेकरूंचा पहिला गट शनिवारी पहाटे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाहून हजकडे रवाना झाला. यावेळी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी विमानतळावर उपस्थित राहून सुरक्षित प्रवासासाठी प्रार्थना करत यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री श्री. शेख म्हणाले की, कोरोना महामारीच्या जागतिक संकटामुळे गेली दोन वर्षे सर्वच धर्मांच्या विविध उपक्रमांवर निर्बंध लावण्यात आले होते. कोरोनाच्या संकटाचे मळभ आता हळू-हळू दूर होत आहे. आज दोन वर्षांनंतर हज यात्रेसाठी पहिला गट रवाना होत आहे, ही अतिशय आनंदाची आणि उत्साहाची बाब असल्याचे सांगून सर्व यात्रेकरूंना मंत्री श्री. शेख यांनी शुभेच्छा दिल्या.