दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्यासंदर्भात मोहीम राबविणार – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई, दि. 11 : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरक्षित वातावरणात घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन राज्यभर समान स्तरावर ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्यासाठी सज्ज होताना (‘वी कॅन डू ईट ऑफलाईन एक्झाम’) ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्यासंदर्भातील मोहीम राज्यभर राबविण्यात येणार असल्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

आज चर्नी रोड येथील बालभवन येथे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या परिक्षांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, एसएससी मंडळाचे प्रकल्प समन्वयक दिनकर पाटील, एसईआरटीचे संचालक दिनकर टेमकर, उपसंचालक विकास गरड यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी आणि शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.

शालेय शिक्षण मंत्री श्रीमती गायकवाड म्हणाल्या, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे योग्य आहे. यासाठी शिक्षक प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्यासाठी प्रवृत्त करावे. सर्वांनी एकत्र येऊन शासनासोबत ही मोहीम यशस्वीपणे राबवून विद्यार्थ्यांची सकारात्मक मानसिकता तयार करण्यासाठी सहकार्य करावे.

विद्यार्थ्यांची सुरक्षा, शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये आणि परिक्षेच्या पूर्वतयारीस वेळ मिळावा या सर्व बाबींचा विचार करून परिक्षेचे वेळापत्रक ठरविण्यात आले आहे. वेळापत्रकाबाबत आणखी काही सुचना असतील तर त्या सादर कराव्यात. त्याबाबत सल्लागार समितीशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. प्रॅक्टीकल परीक्षा, जनरल सादर करणे याबाबत संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एकसारखा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

सह्याद्री वाहिनीवर शासनामार्फत व्याख्यानमाला सुरू असून, परिक्षेच्या पूर्वतयारीसाठी महत्त्वाचे प्रश्न, स्वाध्याय यासाठीही कार्यक्रम घेतले जातील असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना सामान्यत: पडणाऱ्या प्रश्नांबाबत वेबसाईटवर लवकरच ‘एफएक्यु’ (FAQ) देण्यात येणार आहेत. ज्या निवासी शाळा बंद आहेत, त्या शाळेतील फक्त दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची आणि परीक्षा देण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असेही मंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी प्रतिनिधिक पालक, शिक्षक यांनी शालेय शिक्षण विभागाच्या परिक्षेच्या तयारीबद्दल समाधान व्यक्त केले.