सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारी महिन्यात होणार नाहीत – रमेश पोखरीयाल ‘निशंक’

संबंधितांशी चर्चा केल्यानंतर सीबीएसई परीक्षेच्या तारखा जाहीर करेल – केंद्रीय शिक्षण मंत्री

नवी दिल्ली ,२२ डिसेंबर :केंद्रीय शिक्षणमंत्री  रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज आगामी स्पर्धात्मक व बोर्डाच्या परीक्षांसंदर्भात देशभरातील शिक्षकांशी आभासी माध्यमातून संवाद साधला.

यावेळी पोखरियाल म्हणाले की,  गुरूचे महत्त्व हे नेहमीच देवापेक्षाही अधिक आहे आणि म्हणूनच आचार्य देवो भव: ही भावना निरंतर मनात ठेवून आपण सर्व शिक्षकांचा आदर केला पाहिजे.  शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच देशाची ऑनलाईन शिक्षण व्यवस्था यशस्वी झाली आहे असे ते म्हणाले.  विद्यार्थी आणि समाजात मोठ्या प्रमाणात  कोविड -19 संबंधित जनजागृती केल्याबद्दल त्यांनी सर्व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कोविड 19  विरोधातील या युद्धामध्ये प्रामाणिकपणे सहभागी झाल्याबद्दल त्यांनी शिक्षकांचे आभार मानले.

बोर्डाच्या परीक्षेच्या तारखांशी संबंधित प्रश्नावर उत्तर देताना पोखरियाल म्हणाले की हे सरकार विद्यार्थीभिमुख असल्याने आम्ही नेहमीच विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम केले आहे. सीबीएसई 2021 च्या परीक्षा घेण्यासाठी आवश्यक तयारी करीत आहे.  फेब्रुवारी महिन्यात बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत आणि सीबीएसई लवकरच संबंधितांशी चर्चा करून परीक्षेच्या तारखा जाहीर करेल असे पोखरियाल यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

इयत्ता नववीमध्ये व्यावसायिक शिक्षण देण्याच्या सूचनेबाबत पोखरीयाल म्हणाले की जवळपास 8,583 सीबीएसई शाळांमध्ये व्यावसायिक शिक्षण दिले जात आहे.   एनईपी 2020 लागू झाल्यानंतर 2,80,000 पेक्षा जास्त माध्यमिक शाळा, जवळपास 40,000 महाविद्यालये आणि 1,000 हून अधिक विद्यापीठांतून विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसह व्यावसायिक शिक्षण मिळेल अशी अपेक्षा आहे.

शिक्षकांना शाळांमध्ये कार्यक्षमता आधारीत शिक्षणाच्या अंमलबजावणीसंदर्भात पुरेसे प्रशिक्षण दिले जावे या सूचनेला उत्तर देताना पोखरीयाल यांनी सांगितले की शिक्षण मंत्रालयाने देशातील 42,00,000 प्राथमिक शाळेतील शिक्षक व शाळेतील मुख्याध्यापकांसाठी ऑनलाईन क्षमता निर्माण करणारा निष्ठा कार्यक्रम राबविला आहे. देशात साथीच्या आजाराचा उद्रेक होण्याआधी हा कार्यक्रम समोरासमोर राबविण्यात येत होता. त्यानंतर देशभरात साथीच्या आजाराचा उद्रेक झाल्यानंतर महामारीच्या काळात अध्यापन आणि शिक्षणाच्या आवश्यकता लक्षात घेत यात बदल करून हा 100% ऑनलाईन करण्यात आला.

लॉकडाउन सुरू होताच सीबीएसई, केव्हीएस आणि जेएनव्ही यांनी त्यांच्या शिक्षकांची ऑनलाईन शिकवण्याची क्षमता वाढविण्यासाठी, शक्य असेल तेथे ऑनलाइन पद्धतीने शिकवण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपक्रम राबविले. या प्रक्रियेत सीबीएसईने संपूर्ण  भारतात 4,80,000 शिक्षकांना, केव्हीएसने 15855 आणि जेएनव्हीने 9085 शिक्षकांना प्रशिक्षण दिले. एनव्हीएसने शिक्षकांना ऑनलाईन मूल्यांकन संबंधी देखील प्रशिक्षण दिले. पोखरियाल पुढे म्हणाले की शिक्षकांना शोध आधारित आणि अनुभवात्मक शिक्षणासाठी सतत प्रशिक्षण दिले जाते. शालेय शिक्षणासाठी नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (एनसीएफ) देखील सुरू केला आहे आणि एनसीईआरटीकडून नवीन एनसीएफच्या अनुषंगाने पाठ्यपुस्तकांमध्ये बदल करण्याची अपेक्षा आहे. सर्जनशील विचार, जीवन कौशल्य, भारतीय नीति, कला आणि समाकलन इत्यादी क्षेत्रे एकत्रित करणे आवश्यक आहे.