राष्ट्रीय लोकअदालतीपुढे जास्तीत जास्त प्रकरणे सामोपचाराने मिटवावित-मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कमल खता यांचे आवाहन

मुंबई,८ नोव्हेंबर /प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांनी 12 नोव्हेंबरला आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीपुढे जास्तीत जास्त प्रकरणे सामोपचाराने मिटविण्याचे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कमल खता यांनी केले. मुंबई जिल्हा विधि सेवा प्राधिकरण व मुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर व जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने एस्‌.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, चर्चगेट येथे आयोजित मेगा लिगल सर्विस कॅम्प या महाशिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

या महाशिबीरात राष्ट्रीय राज्य विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व शासनाच्या विविध विभागतील योजनांचा प्रसार व प्रचार होण्याच्या दृष्टीने स्टॉल्स मांडण्यात आले होते.यावेळी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष एस. व्ही. गंगापूरवाला ,नगर दिवाणी व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम्, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण सदस्य सचिव दिनेश सुराणा, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उप-सचिव मिलिंद तोडकर, कौटुंबिक न्यायालय अध्यक्ष, मुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण प्रमुख न्यायाधीश स्वाती चौहान, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, उपस्थित होते.

जनतेसाठीच्या विविध योजना कार्यान्वित करण्यासाठी नवीन अॅप लवकरच सुरु करणार असल्याचे मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी यावेळी सांगितले.

मुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या स्वाती चौहान यांनी मुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची कामगिरी उल्लेखनीय असल्याचे सांगितले.

मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष अनिल सुब्रमण्यम् म्हणाले की,प्रत्येक नागरिकाला विधी सहाय व सेवा मिळण्याकरिता जास्तीत जास्त जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करुन तळागाळातील जनतेपर्यंत या योजनेचा लाभ पोहचावा.यावेळी आयोजित करण्यात आलेल्या MARCH FOR ACCESS TO JUSTICE रॅलीमध्ये विधी महाविद्यालयातील विदयार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते.