राज्यात लॉकडाऊनच्या काळात ४७३ गुन्हे दाखल; २५६ लोकांना अटक
मुंबई दि.१२ : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ४७३ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २५६ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.
राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ४७३ गुन्ह्यांची नोंद कालपर्यंत झाली आहे. जिल्हानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे-
आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे दाखल
■ व्हॉट्सॲप- १९४ गुन्हे
■ फेसबुक पोस्ट्स – १९३ गुन्हे दाखल
■ टिकटॉक व्हिडिओ- २४ गुन्हे दाखल
■ ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – ८ गुन्हे दाखल
■ इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट- ४ गुन्हे
■ अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर – ५० गुन्हे दाखल
■ वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २५६ आरोपींना अटक.
■ १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश
■ बीड जिल्ह्यातील धारुर पोलीस ठाण्यामध्ये एका गुन्ह्याची नोंद
बीड जिल्ह्यातील नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ४८ वर
■ या गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीला धार्मिक रंग देणारा टिकटॉक व्हिडिओ बनवून प्रसारित केला, त्यामुळे परिसरात काही काळ तणाव तयार झाला होता ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.
महाराष्ट्र सायबरचे आवाहन
शासनाने कोरोना महामारीच्या काळात म्हणून सर्वसामान्य जनतेच्या हालचालींवर काही निर्बंध आखून दिले होते व त्याकरिता नियम देखील केले होते. सध्याच्या काळात सरकारने हे घातलेले निर्बंध, नियम आणि अटी या शिथिल केल्या आहेत व ज्यामुळे सर्वसामान्य जनतेला आपले दैनंदिन जीवन पूर्वपदावर येण्यास मदत होईल.
मात्र, गेल्या दोन दिवसांपासून विविध सोशल मीडियावर काही मेसेज व पोस्ट फिरत आहेत की, “सर्वसामान्य जनता सोशल डिस्टनसिंग व अन्य काही नियमांचे पालन करत नाही, त्यामुळे सर्व शिथिल केलेल्या अटी, नियम व निर्बंध सरकार पुढे चालू ठेवणार आहे.”
वरील नमूद आशयाचा मजकूर खोटा असून अशा कोणत्याही मेसेज व पोस्टवर विश्वास ठेवू नका व तुम्हीदेखील कोणाला फॉरवर्ड करू नका, असे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे.
कोरोना महामारी संदर्भातील कोणत्याही माहितीबाबत केंद्र व राज्य सरकार हे नागरिकांना नियमितपणे अधिकृतरीत्या निवेदन करून सर्व माहिती तपशीलवारपणे देत असते, त्यामुळे सर्व नागरिकांनी फक्त त्याच माहितीवर विश्वास ठेवा. तुम्ही जर व्हॉट्सॲप ग्रुप एडमिन किंवा ग्रुप क्रिएटर असाल व त्या ग्रुपवर कोणी असे मेसेज पाठवत असेल तर त्या ग्रुप सदस्यास तात्काळ ग्रुपमधून काही काळाकरिता काढून टाकावे आणि ग्रुप settings बदलून only admins असे करण्याच्या सूचनाही महाराष्ट्र सायबरने दिल्या आहेत. अफवा पसरविणे हा कायदेशीर गुन्हा तर आहेच पण एक सामाजिक गुन्हा देखील आहे, हा गुन्हा करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा महाराष्ट्र सायबरने दिला आहे.