वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाचा वेग वाढवावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई,२७ डिसेंबर/प्रतिनिधी:- कोविडचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याची गरज आहे. आपल्याला अधिक दक्षता बाळगून काटेकोर पाऊले उचलावी लागणार आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. टास्क फोर्सची बैठकही येत्या एक दोन दिवसांत आयोजित करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोविडच्या वाढत्या संसर्गावर चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी सादरीकरणात जानेवारीच्या मध्याला कोविडच्या सक्रिय रुग्णात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली. लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे असे सांगितले. काही दिवसांपूर्वी आपण दिवसाला 8 लाख डोसेस देत होतो, सद्या 5 लाख डोसेस दिवसाला दिले जातात.

यावेळी सर्व पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करून आपापल्या जिल्ह्यांत लसीकरण वेगाने होईल, असे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

डॉ.व्यास यांनी अधिक माहिती देताना सांगितले की 8 डिसेंबर रोजी 6200 सक्रिय रुग्ण होते. मात्र आज 10 हजार सक्रिय रुग्ण आहेत. एकूणच गेल्या 20 दिवसांत सक्रिय रुग्णांत 50 टक्के वाढ झाली असून मागील सहा दिवसांत रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाल्याची माहिती दिली. राज्यात पॉझिटिव्हिटी रेट 1.06 टक्के झाल्याचेही ते म्हणाले.